मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल करण्यातआलाआहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सर्व कागदपत्रे आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. यामुळे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयातील चकरा मारण्याची गरज उरणार नाही. यापूर्वी रुग्णांना स्वतः अर्ज करावा लागायचा. आता संबंधित रुग्णालयांनाच रुग्णाची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतील. यासाठी प्रत्येक रुग्णालयाला स्वतंत्र 'लॉगिन' आणि 'पासवर्ड' दिला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अर्ज अपलोड केल्यानंतर 3 ते 8 कार्यालयीन तासांच्या आत मदतीचा निर्णय रुग्णालय आणि नातेवाईकांना कळवला जाईल. कागदपत्रे उशिरा अपलोड झाल्यास दुसऱ्या दिवशी कार्यालयीन वेळेत निर्णय दिला जाईल. तसेच मंजूर झालेली पूर्ण रक्कम एकाच वेळी न देता, सुरुवातीला 30% रक्कम आणि उर्वरित रक्कम रुग्णाला डिस्चार्ज मिळताना दिली जाईल, अशी देखील माहिती आहे.
कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी त्रिपक्षीय करार, मोफत उपचार
अशातच, 2025 मध्ये या निधीतून 40,776 रुग्णांना सुमारे 333.6 कोटी रुपयांची मदत करण्यात आलीय. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या माध्यमातून ही मदत आणखी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि 'भारत पेट्रोलियम' (BPCL) सोबत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. यामुळे अशा मुलांना मोफत उपचार मिळण्यास मदत होईल. या नवीन डिजिटल प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढील आठवड्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू
सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, दि. 7 एप्रिल 2026 पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. रुग्णालयांनी आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी संबंधितांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ आणि सुलभ पद्धतीने मदत मिळावी यांकरिता घेतलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.महत्त्वाची टीप: जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला या मदतीची गरज असेल, तर तुम्ही १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.