चोर निघाला 'वॉटरमॅन'! पाण्यात ५ तास श्वास रोखूनही सुटका नाही; आरपीएफचा दणका
एखाद्या हॉलिवूड चित्रपटात किंवा लष्करी मोहिमेत पाहायला मिळावा, असा थरार जबलपूर रेल्वे स्थानक परिसरात पाहायला मिळाला. प्रवाशांच्या बॅगा आणि दागिने लंपास करणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला चक्क तलावात उतरावे लागले.
अटक टाळण्यासाठी हा चोर चक्क ५ तास शेवाळं असलेल्या तलावाच्या पाण्यात लपून बसला होता. महत्त्वाचे म्हणजे, श्वास घेण्यासाठी तो कमळाच्या पोकळ देठाचा वापर करत होता. अखेर आरपीएफने डायव्हर्सच्या मदतीने त्याला शोधून काढले.
६ एप्रिलच्या पहाटे ४:५० च्या सुमारास जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकावर आरपीएफचे पथक गस्तीवर होते. दरम्यान, गाडी क्रमांक ११७५३ मधून एक संशयास्पद व्यक्ती उतरली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. या व्यक्तीने चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू करताच, आरोपीने जवळच्याच एका मोठ्या शेवाळलेल्या तलावात उडी मारली.
कमळाच्या देठाने श्वास अन् ५ तासांचा खेळ
तलावात उडी मारल्यानंतर तो चोर बाहेर येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र, तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. तपासात असे लक्षात आले की, तो अत्यंत हुशारीने पाण्याखाली लपला होता आणि श्वास घेण्यासाठी त्याने पाण्यात असलेल्या कमळाच्या देठाचा वापर केला. ५ तास तो पाण्यात तसाच राहिला. अखेर स्थानिक पोलिसांना आणि डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. तासनतासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर आल्यावरही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरपीएफने त्याला पकडले.
जुना पेपर आणि गुन्हेगाराची खरी ओळख
सुरुवातीला या आरोपीने पोलिसांना आपली खोटी ओळख सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी एका जुन्या बातमीशी त्याचा चेहरा आणि माहिती जुळवली. त्यातून त्याची खरी ओळख पटली. हरविंदर सिंग असे या कुख्यात चोरट्याचे नाव आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांत त्याच्यावर चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत.
कुख्यात गुन्हेगार
हरविंदर सिंग हा प्रामुख्याने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करतो. विनातिकीट प्रवास करणे, महिला किंवा ज्येष्ठ प्रवाशांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची रोकड किंवा दागिने लंपास करणे, ही त्याची पद्धत आहे. पकडले जाऊ नये म्हणून तो स्वतःसोबत कोणतेही ओळखपत्र बाळगत नाही आणि वारंवार सिम कार्ड बदलत असतो. भोपाळ, इटारसी, उज्जैन, विशाखापट्टणम आणि महाराष्ट्रातील इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात वॉरंट आहेत.
'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत कारवाई
आरपीएफचे निरीक्षक राजीव खर्ब, उपनिरीक्षक अरविंद आणि कॉन्स्टेबल विनय मौर्य व आशिष यादव यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. आरोपीला आता जबलपूरच्या विशेष रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून, विविध राज्यांतील पोलीस त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.