Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"सांगली, सोलापूरसह २३ जिल्ह्यांत उन्हाच्या झळा वाढणार; हवामान विभागाकडून 'उष्णतेच्या लाटे'चा इशारा"

​"सांगली, सोलापूरसह २३ जिल्ह्यांत उन्हाच्या झळा वाढणार; हवामान विभागाकडून 'उष्णतेच्या लाटे'चा इशारा"


महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 17 एप्रिलला तब्बल 23 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

17 एप्रिलला 23 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात गुरुवारी (17 एप्रिल) तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. कारण तब्बल 23 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 एप्रिलला कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना, यासोबतच धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना दुपारी 1 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडणयाचं आवाहन करण्यात आलं आहे.

दोन जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
असं असलं तरी 2 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर संध्याकाळच्या वेळी ढगांच्या गडगडाट, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
18 तारखेला काय होणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी तापमान तुलनेने कमी होईल. केवळ जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या 10 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण यापैकी काही जिल्ह्यांमध्ये दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर संध्याकाळी वातावरणात बदल होवून वादळी पावसाची शक्यता आहे.

18 तारखेला कुठे पाऊस पडण्याची शक्यता?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोलापूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह वादळी, हालका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्‌याचा वारा (30-40 किमी प्रतितास) सुटण्याची देखील शक्यता आहे.
19 तारखेला वातावरणात मोठा बदल होणार, अनेक ठिकाणी पाऊस पडणार

दोन दिवसांनी 19 एप्रिलला वातावरणात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या दिवशी अकोला आणि अमरावती या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा असणार आहे. इतर ठिकाणी वातावरण थंड होण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव अशा 8 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

20 तारखेला 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
येत्या 20 एप्रिलसाठी हवामान विभागाकडून 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.