चेन्नई : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर विविध संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज बहुतांश संस्थांकडून वर्तवण्यात आला आहे.
मात्र, तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता एका संस्थेच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आली आहे. पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिनेता विजय याच्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाला मोठं यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष 120 जागांवर विजय मिळवू शकतो. दुसऱ्या स्थानी द्रमुक आणि तिसऱ्या स्थानी अण्णाद्रमुक राहू शकते.
एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार टीव्हीके पक्षाला यावेळी 98 ते 120 जागांवर विजय मिळेल. तर, द्रुकला 92-110 जागांवर विजय मिळू शकतो. अण्णाद्रमुक पक्षाला 22-32 जागा मिळू शकतात. तामिळनाडूत सध्या द्रमुकचं सरकार असून काँग्रेसची त्यांच्यासोबत आघाडी आहे. तर, भाजप अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरलं तर अभिनेता विजय राजकारणात मोठा चमत्कार करण्यात यशस्वी ठरेल. विजय यानं दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला होता आणि त्याच्या पक्षानं पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. विजयच्या प्रचाराच्या सभांना मोठी गर्दी होत होती.
बहुतांश संस्थांचा अंदाज, द्रमुक पुन्हा सत्तेत
एक्सिस माय इंडियानं अभिनेता विजयचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज वर्तवला असला तरी इतर संस्थांनी तामिळनाडूत द्रमुकची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे. मॅटराइज एक्झिट पोलनं द्रमुक आघाडीला 122-132 जागा, अण्णाद्रमुक आणि मित्रपत्रांना 87-100 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे. पी मार्कनं द्रमुक आघाडीला 125-145 जागा, अण्णाद्रमुक आघाडीला 65-85 जागा आणि टीव्हीकेला 16-26 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पीपल्स इन्साईटनुसार TVK ला 30-40 जागा
पीपल्स पल्स नुसार तामिळनाडूत द्रमुकची पुन्हा सत्ता येऊ शकते. द्रमुक आघाडीला 125-145 जागांवर विजय मिळू शकतो. अण्णा द्रमुक आघाडीला 65-80 जागांवर विजय मिळू शकतो. तर टीव्हीकेला 18-24 जागांवर विजय मिळू शकतो. प्रजा पोल्सनुसार द्रमुक आघाडीला 148-168 जागांवर विजय मिळेल. तर, अण्णाद्रमुकला 61-81 जागा मिळू शकतात. अभिनेता विजयच्या पक्षाला 9 जागांवर विजय मिळू शकतो. पीपल्स इनसाईनुसार अभिनेता विजयचा पक्ष 30 ते 40 जागा जिंकू शकतो. तर, द्रमुकला 120 ते 140 जागांवर विजय मिळू शकतो. तर, अण्णाद्रमुकला 60-70 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.