Big Breaking! सांगली पोलिसांचा 'खाकी' क्रूर चेहरा! नदीकाठी मोटर दुरुस्त करणाऱ्या दोन भावांना अमानुष मारहाण; एकाची प्रकृती चिंताजनक!
सांगली (बहे): सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर जवळील बहे या गावात पोलिसांचा एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष चेहरा समोर आला आहे. नदीकाठी मोटर दुरुस्तीसाठी थांबलेल्या दोन सख्ख्या भावांना साध्या वेशातील दोन पोलिसांनी कोणत्याही कारणाशिवाय बेदम मारहाण केली. या अमानुष कृत्यामुळे अवधूत पाटील आणि विनय पाटील हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत आणि विनय पाटील हे दोघे भाऊ नदीवरील शेतीची मोटर दुरुस्त करण्यासाठी वायरमनची वाट पाहत थांबले होते. याच दरम्यान साध्या वेशातील दोन पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी कोणतीही विचारपूस न करता किंवा कारण न सांगता या दोन्ही भावांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. "आम्ही काय गुन्हा केला आहे?" असे वारंवार विचारूनही पोलीस थांबायला तयार नव्हते.
दोषींवर कारवाईची मागणी:
या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ चौकशी नको तर संबंधित दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
मोर्चाचा इशारा:
जर दोषी पोलिसांवर त्वरित निलंबनाची कारवाई झाली नाही, तर ईश्वरपूर पोलीस ठाण्यावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धार बहे ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, आता पोलीस प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.