राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असून पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे भाजपमध्ये जाणाऱ्या राष्ट्रवादीतील ४० नेत्यांची नावे असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पक्षाचे माजी सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकताच राजीनामा देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यातच, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील २४ आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल पटेल?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रोहित पवार यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विरोधी पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर सातत्याने सत्ताधारी पक्षात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत कलह असून पक्ष फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही," असेही लोंढे यांनी म्हटले.
दरम्यान, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर लोंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "उद्धव ठाकरे यांची उपस्थिती कमी होती हे खरे असले, तरी मोदींची उपस्थितीही अत्यल्प आहे. ते केवळ टिंगल-टवाळी करण्यासाठी संसदेत येतात," अशी टीका त्यांनी केली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरही लोंढे यांनी जोरदार निशाणा साधला. "सदाभाऊ स्वतः घुबड आहेत," अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.