"बलात्कार-खून करा, जामीन मिळेल; पण..." पोर्श प्रकरणावरून प्रकाश राज यांचा न्यायव्यवस्थेवर जळजळीत वार!
जेष्ठ अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यात झालेल्या बहुचर्चित पोर्श कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीच्या वडिलांना जामीन मिळाल्यानंतर प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे.
ज्यामध्ये त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर संताप व्यक्त केली आहे.
पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर गंभीर गुन्ह्यांतील प्रभावशाली लोकांना ज्या सहजतेने व्हीआयपी वागणूक आणि जामीन मिळतो, यावर प्रकाश राज यांनी नेमके बोट ठेवले आहे. त्यांनी लिहिले की, "तुम्ही बलात्कार करू शकता, खून करू शकता, द्वेषपूर्ण भाषणबाजी करू शकता आणि रस्ते अपघातात लोकांना मारू शकता... आमची न्यायव्यवस्था तुम्हाला नक्कीच जामीन देईल. पण... पण... पण... तुमचे नाव उमर खालिद असू नये".
प्रकाश राज यांची ही प्रतिक्रिया अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा उमर खालिद २०२० पासून तुरुंगात असून त्यांच्या नियमित जामीन अर्जांना वारंवार नकार देण्यात आला आहे. दुसरीकडे, अलीकडील पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह अनेक मुख्य आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर संबंधित आरोपींना पार्टी करताना आणि सेलिब्रेशन करताना पाहिल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता.
पुणे पोर्श प्रकरण
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हायप्रोफाइल पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या भीषण अपघातात दोन निष्पाप आयटी इंजिनिअर्सचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील रक्ताचे नमुने बदलण्याच्या कथित कटातील एका मुख्य आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. मात्र, त्यानंतर आता कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
कोण आहे उमर खालिद आणि तो तुरुंगात का आहे?
उमर खालिद हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) माजी विद्यार्थी नेता आणि 'युनायटेड अगेन्स्ट हेट' या मोहिमेचा संस्थापक आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीच्या मागे एक 'मोठा कट' रचल्याच्या आरोपाखाली १४ सप्टेंबर २०२० रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या (UAPA) अंतर्गत अटक केली होती. तेव्हापासून तो तिहार तुरुंगात आहे. या वर्षी ५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची प्रकृती आणि पुरावे पाहता त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला होता. केवळ त्याच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी त्याला ३ दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला होता. तो गेल्या साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असून त्याचे जामीन अर्ज वारंवार फेटाळले जात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.