'आजची स्थिती काय ते आधी बघा...'; सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून जयकुमार गोरेंनी जय पवारांना जमिनीवर आणलं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी 2029 ला बारामतीतून विधानसभेला सुनेत्रा पवाराच उभ्या राहतील आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जागा घ्यायला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आगामी विधानसभा 2029 बारामतीतून कोण उमेदवार असणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय बारामतीत जय पवार यांच्या वक्तव्यानंतर 'होय मुख्यमंत्रीच' 'महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार', असं लिहिलेले बॅनर झळकले आहेत.
जय पवार नेमकं काय म्हणाले?
जय पवार म्हणाले, "काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभं राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे."
तर जय पवारांच्या याच वक्तव्यावर भाजप नेते जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयकुमार गोरे म्हणाले, "मुख्यमंत्री व्हायला मोठा जनाधार लागतो. प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते आपला नेता मोठा व्हावा. पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमदाराची संख्या आणि पाठिंबा लागतो.पण आजची स्थिती पाहता 2029 मध्ये देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील.', असं म्हणत गोरेंनी सुनेत्रा पवार नव्हे तर देवेंद्र फडणवीसच 2029 ला पण मुख्यमंत्री असतील असं म्हणत भाजपचा मुख्यमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला.
तसंच मुख्यमंत्री व्हायला मोठा जनाधार लागतो, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला डिवचलं देखील आहे. त्यामुळे आतापासून महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून राजकारण चांगलंच तापणार हे आतापासूनच दिसायला सुरूवात झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.