लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आर्थिक मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आर्थिक आघाडीवर सरकार सपशेल अपयशी ठरलंय, असा आरोपही त्यांनी केला. रायबरेली येथे ते बोलत होते. जे आर्थिक वादळ (मंदी) येणार आहे, त्याचा सर्वात मोठा फटका देशातील शेतकरी, तरूण आणि लहान व्यापाऱ्यांना बसणार आहे. खूपच कठीण काळ येणार आहे. असा काही आर्थिक झटका लागेल की मागील अनेक वर्षांत असं झालं नाही, असंही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी पश्चिम आशियातील संकटाचा उल्लेख केला. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. या संघर्षाच्या काळात इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा मिळवला आहे. जगभरातील देशांत जी तेलाची आयात केली जाते, त्याचा मोठा भाग या सामुद्रधुनीतून वाहून नेला जातो. दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीवरील आमची पकड ढिली होऊ देणार नाही, असे इराणने ठासून सांगितले आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश देशांना तेल आणि इंधन, गॅस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
एक भयंकर आर्थिक वादळ येत आहे ही दुर्दैवी बाब आहे. हे येणारे वादळ कुणीच रोखू शकणार नाही. असं वादळ आपल्या आयुष्यात कधी बघितलं नसेल, असे ते म्हणाले. सर्वात मोठं नुकसान कुणाचं होणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. सर्वात मोठं नुकसान भारतातील शेतकरी, मजूर, तरुण, लहान व्यापारी आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लहान उद्योगांचा होणार आहे, असं राहुल म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. उपाययोजना करण्याऐवजी मोदी विदेशात फिरायला जाऊ नका, असे देशाला सांगून स्वतः संपूर्ण जग फिरायला जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. सोने खरेदी करू नका, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा आणि विदेशात फिरायला जाऊ नका असं आवाहन करत आहेत. पण त्यानंतर लगेच ते स्वतः विदेश दौऱ्यावर गेले, असे सांगतानाच जनतेला जागरूक व्हायला हवे. जोपर्यंत तुम्ही या सरकारला हटवत नाहीत, तोपर्यंत देश वाचणार नाही, असं राहुल म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.