"एक कर्तव्यदक्ष प्रवास अर्धवट सुटला; अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची प्राणज्योत वयाच्या ४५ व्या वर्षी मालवली"
राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट-५, दौंडचे समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (वय ४५) यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
तुषार पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर शहर पोलीस उपाधीक्षक म्हणून काम पाहिले होते. तसेच त्यांनी पीसीआरचे अधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांची एसआरपीएफ गट-५, दौंड येथे समादेशकपदी नियुक्ती झाली होती. कोल्हापुरात जिल्हा परिषदेजवळील एका अपार्टमेंटमध्ये त्यांचे वास्तव्य होते. आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना किडनी दान केली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली होती आणि ते नियमितपणे सेवेत कार्यरत होते.
सोमवारी सकाळी नऊ वाजता जळगाव जिल्ह्यातील जामनेर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी शिल्पा नाईक, मुलगा संकेत आणि एक भाऊ असा परिवार आहे.
एसआरपीएफ भरती गैरप्रकरणामुळे आले होते चर्चेत
तुषार पाटील यांच्या कार्यकाळात एसआरपीएफ गट-५, दौंड येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता. भरती परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न हे एका खाजगी प्रश्नसंचातून आल्याचे समोर आले होते. पेपरफुटीचा संशय निर्माण झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तुषार पाटील यांना मुख्य दोषी मानण्यात आले होते. त्यांच्याविरोधातील कारवाईचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.