सोशल मीडियावर सध्या २००५ पूर्वी जारी करण्यात आलेल्या ₹१०, ₹२०, ₹५० आणि ₹१०० च्या नोटा ३० जून २०२६ नंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये स्वीकारल्या जाणार नसल्याचा संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. मात्र, हा संदेश पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रने स्पष्ट केले आहे.
व्ह्ययरल होणारा फोटो –
बँकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, व्हायरल होत असलेल्या पोस्टरमधील माहिती चुकीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोस्टरमध्ये १ जुलै २०२६ पासून २००५ पूर्वीच्या ₹१०, ₹२०, ₹५० आणि ₹१०० च्या नोटा कोणत्याही स्थानिक शाखेत स्वीकारल्या जाणार नाहीत, तसेच त्या केवळ रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत केंद्रांमध्येच जमा कराव्या लागतील, असा दावा करण्यात आला आहे.
मात्र, बँक ऑफ महाराष्ट्रने या दाव्याचे खंडन करत ग्राहकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही आर्थिक अथवा बँकिंगविषयक माहिती मिळविण्यासाठी केवळ बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत सोशल मीडिया हँडल्स किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत माध्यमांवरच अवलंबून राहावे, असेही बँकेने म्हटले आहे. बँकेने ग्राहकांना अप्रमाणित संदेश पुढे पाठविणे टाळण्याचे आवाहन केले असून, सोशल मीडियावरील भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.