मुंबई : आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी लोकप्रिय असलेले डॅशिंग आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता मुंबईतील अस्वच्छ आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या हॉटेल्सविरुद्ध आपला मोर्चा वळवला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. तुकाराम मुंढे यांनी सोमवारी मुंबईतील तब्बल ६ बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर थेट लायसन्स निलंबनाची (परवाना रद्द) धडक कारवाई केली आहे. मुंढे यांच्या या दणक्यामुळे मुंबईतील बड्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी बड्या समूहाच्या रेस्टॉरंटलाही सोडले नाही!
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा दणका आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटलाही बसला आहे. नरिमन पॉइंट येथील आदित्य बिर्ला न्यू एज रेस्टॉरंट्स अँड कॅफे प्रा. लि. तर्फे चालवल्या जाणाऱ्या 'फ्लिट अँड वार्सा' या हायप्रोफाईल रेस्टॉरंटची २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. तिथे चक्क अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. मुंढे यांच्या आदेशानंतर या बड्या रेस्टॉरंटचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कोणत्या हॉटेल्सवर तुकाराम मुंढे यांची कारवाई?
हॉटेल गोपालकृष्ण (सांताक्रूझ पूर्व): या हॉटेलच्या थेट स्वयंपाकगृहात (किचनमध्ये) उंदीर फिरताना आढळून आले.कराक एंटरप्रायझेस (अंधेरी): या नामांकित ठिकाणी किचन आणि साठवणुकीच्या जागी झुरळांचा मोठा प्रादुर्भाव आढळला.मद्रास डायरीज (वांद्रे): सेलेब्रिटीजच्या आवडीच्या वांद्रे परिसरातील या हॉटेलमध्ये स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे उघड झाले.एम. के. बेकरी (बोरीवली): या बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच, धूळ आणि कचऱ्यात अन्न उत्पादन सुरू होते. तसेच योग्य लेबल नसलेला संशयास्पद साठाही जप्त करण्यात आला.हॉटेल श्रीकृष्ण (भांडुप): येथील फ्रिजची स्थिती अत्यंत निकृष्ट आणि आरोग्यास घातक होती, तसेच स्वच्छतेच्या अनेक त्रुटी आढळल्या.
'मुंढे स्टाईल' कारवाईने मुंबईत खळबळ
'नियम पाळा, नाहीतर कारवाईला सामोरे जा' अशा कडक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कार्यभार स्वीकारल्यापासून आपल्या कारवायांना भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडले आहे. लोकांच्या आरोग्यासोबत होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या या सहाही आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करून मुंढे यांनी संपूर्ण मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीला कडक इशारा दिला आहे. या धडक मोहिमेमुळे तुकाराम मुंढे यांच्याविषयी हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.