"देशात 'सिंघम' नाही, कायद्याचे राज्य हवे!" कोर्टाने काढली राजकारण्यांची मस्ती; BJP आमदाराला ४ वर्षांची जेल!
दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सत्तेच्या बळावर मनमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर शब्दांत टिप्पणी करत, कायद्याच्या राज्यात कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
"कायद्याच्या राज्याला 'सिंघम' किंवा 'पुष्पा' यांपैकी कोणाचीही गरज नाही," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने लोकप्रतिनिधींनी शस्त्रांचे प्रदर्शन करणे समाजासाठी चुकीचा संदेश असल्याचे म्हटले आहे.
चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा
डॉ. अर्चना गुप्ता यांच्या मृत्यूप्रकरणी २०१८ मध्ये झालेल्या उत्सवी गोळीबाराच्या प्रकरणात बिहारमधील साहिबगंजचे भाजप आमदार राजू कुमार सिंह यांना विशेष न्यायाधीश विशाल गोगाने यांनी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. निर्णय देताना न्यायालयाने चित्रपटांतील पात्रांप्रमाणे बंदूक दाखवून प्रभाव निर्माण करणे हे शौर्य नसून कायद्याचे उल्लंघन असल्याचे नमूद केले.
बचाव पक्षाची दयेची मागणी
शिक्षा सुनावण्यापूर्वी झालेल्या सुनावणीत आमदारांच्या वतीने ज्येष्ठ वकिलांनी दयेची विनंती केली. राजू कुमार सिंह हे २००५ पासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी बिहार सरकारमध्ये पर्यटन मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती असल्याने कोणताही वाईट हेतू नव्हता, असेही सांगण्यात आले. तसेच, गोळी लागल्यानंतर जखमी झालेल्या महिलेला स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेल्याचा दावाही करण्यात आला.
बचाव पक्षाने दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होईल आणि त्याचा मतदारसंघातील विकासकामांवर परिणाम होईल, असे सांगत त्यांना परिवीक्षाधीन मुक्त करावे किंवा किमान शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
सरकारी पक्षाचा विरोध
अतिरिक्त सरकारी वकील चिरंजित सिंग यांनी या सर्व युक्तिवादांना विरोध करत लोकप्रतिनिधी म्हणून आरोपीवर अधिक जबाबदारी होती, असे न्यायालयाला सांगितले. उत्सवाच्या नावाखाली धोकादायक कृत्य केल्यामुळे त्यांना कमाल शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली. न्यायालयाने बचाव पक्षाचे युक्तिवाद फेटाळून लावले.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपीने गोळीबाराचे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांना पुरावे मिळू नयेत म्हणून डान्स फ्लोअरवरील रक्त साफ करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. घटनेनंतर आरोपी दिल्लीतून पळून नेपाळमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला कुशीनगरजवळ अटक केली.
पोलिसांनी गोळा केले भक्कम पुरावे
तपासादरम्यान घटनास्थळावरून दोन वापरलेली .२२-बोअर काडतुसे जप्त करण्यात आली. राजू सिंग यांच्या घरातून जिवंत तसेच वापरलेली काडतुसे मिळाली, तर हरी सिंग यांच्या घरातून .३१५-कॅलिबरची रायफल जप्त करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रकरण न्यायालयात प्रभावीपणे मांडले.
नववर्षाच्या पार्टीत घडली दुर्घटना
तक्रारदार विकास गुप्ता यांच्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०१८ रोजी ते पत्नी डॉ. अर्चना गुप्ता आणि मुलीसह मंडी गावातील आंबेडकर कॉलनीतील रोझ फार्म येथे नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीत सहभागी झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी चालक हरी सिंग आणि आमदार राजू सिंग यांना हवेत गोळीबार करताना पाहिले. काही मिनिटांनंतर पुन्हा गोळीबार झाला आणि त्यानंतर डॉ. अर्चना गुप्ता जमिनीवर कोसळल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र ३ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
शिक्षा झाल्यानंतर भावनिक संदेश
शिक्षा सुनावल्यानंतर आमदार राजू कुमार सिंह यांनी शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर मतदार आणि परिसरातील नागरिकांसाठी संदेश प्रसिद्ध केला. "मी तुमचे दुःख आणि प्रेम पूर्णपणे समजू शकतो. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की, धैर्यवान राहा," असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.