एका मुलाखतीत बोलताना अनुराधा पौडवाल यांनी देशभरात सुरु असलेल्या लाजीरवाण्या घटनांचा संदर्भत देत मोदी सरकारला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. बऱ्याच मोठ्या काळानंतर पौडवाल यांनी ही मुलाखत दिली आणि बेधडकपणे त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळं त्या अचानक चर्चेमध्ये आल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी राम मंदिर आणि शाळा बंद होत असलेल्या मुद्द्यांवरही सडेतोड भाष्य केलं. विश्वगुरु विश्वगुरु म्हणणं बंद करा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "काही वर्षांपूर्वी मला खूप वाटायचं की आपण विश्वगुरु बनणार आहोत. पण आता मी पाहते की विश्वगुरुला विपरित गोष्टीच जास्त होत आहेत. त्यामुळं कसं आपण विश्वगुरु बनणार आहोत. एकतर आपण विश्वगुरु विश्वगुरु म्हणायचं बंद केलं पाहिजे अन्यथा या सगळ्या नॉनसेन्स गोष्टी बंद केल्या पाहिजेत. केवळ लग्नाच्या पद्धीतच नव्हे तर प्रत्येक गोष्टी आपण विपरित करत आहोत. आपण शिक्षित असायला हवंय ना? मला हेच कळतं नाहीए की जर आपण शिक्षित असणार आहोत तर जवळपास ९३००० किंवा लाखभर शाळा तर बंदच पडल्या आहेत"
विश्वगुरुवरुन केंद्रावर निशाणा
२०४७ पर्यंत भारताच्या विश्वगुरु बनण्याच्या सरकारच्या दाव्यावर प्रतिसाद देताना त्यांनी म्हटलं की, "विश्वगुरु बनण्याचा जो पाया आहे, तो काय आहे? केवळ विश्वगुरु होण्याची स्वप्न पाहिल्यानं काहीही होत नसतं. पण त्यासाठी तुमच्याकडं काहीतरी ठोस गोष्ट सांगण्यासारखी व्हायला पाहिजे. विश्वगुरु होण्याचं स्वप्न पाहताना जर आपण रामराज्य यावं असं स्वप्न बघत असू तर इथं राम मंदिरावरच दरोडा टाकण्यात आला आहे. म्हणजे मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, विश्वगुरु होण्याचं स्वप्न बघणं हे चुकीचं नाही. पण विश्वगुरु होण्यासाठी मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत? कमीत कमी याची यादीतरी पाठवा म्हणजे आम्ही त्यानुसार पुढे जात राहू" अशा स्पष्ट शब्दांत अनुराधा पौडवाल यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त करत सरकारला आरसा दाखवण्याचंही काम केलं आहे.
पद्मश्रीनं सन्मानित
कलेच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारनं त्यांना देशाचा चौथा सर्वात मोठा सन्मान पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय भक्ती संगीत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांच्या योगदानासाठी त्यांना भजनक्वीन, मेलडी क्वीन आणि भक्तीचा अमर आवाज असे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर अवॉर्ड, सहा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन ओडिशा राज्य चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.