भिलवडी : वसगडे (ता. पलूस) येथील रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या तीन वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून ४ कोटी ३७ लाख २३ हजार रुपये आणि त्यावर तब्बल ४ कोटी २० लाख ३६ हजार रुपये व्याज अशी एकूण ८ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम प्रांत कार्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
पुणे-लोंढा रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या वेळी वसगडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रशासनाने घेतल्या होत्या. योग्य मोबदला मिळावा, शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, तसेच जमीन वापरल्याबद्दल 'महा रेल्वे' व रेल्वे विभागाने नुकसान भरपाई किंवा भाडेपट्ट्याची रक्कम द्यावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मध्यंतरी रेल्वे रोको आंदोलनही केले होते.
या प्रकरणी पाठपुरावा करून न्याय मिळवून दिल्याबद्दल वसगडे येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉ. विश्वजित कदम यांची पलूस येथील सूतगिरणीवर भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, उपसरपंच अनिल पाटील, विनोद पाटील, शेतकरी रजत पाटील, सुनील पाटील, अजित पाटील, दिनेश परीट, नीलेश चव्हाण, अक्षय परीट, दत्तात्रय कांबळे, श्रीधर परीट, अरुण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.