नवी दिल्ली : नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांवरून सुरू झालेले विद्यार्थी आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जागतिक पातळीवरील चर्चेचा विषय ठरले. दिल्लीतील लाठीमार, अश्रुधूर, मेणबत्ती मोर्चे आणि रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन करणार्या हजारो विद्यार्थ्यांची दृश्ये जगभरातील प्रमुख वृत्तसंस्थांनी ठळकपणे प्रसिद्ध केली. हे आंदोलन भारतातील तरुणांच्या संधी, शिक्षणव्यवस्था , प्रशासकीय उत्तरदायित्वाबाबतच्या व्यापक असंतोषाचे प्रतीक ठरल्याचे जागतिक माध्यमांनी नमूद केले.
'रॉयटर्स'ने प्रधान यांच्या राजीनाम्याला 'आश्चर्यकारक' म्हटले असून, सार्वजनिक दबावापुढे सहसा माघार न घेणारे नेते अशी मोदी यांची प्रतिमा असल्याचे नमूद केले. या आंदोलनामुळे मोदी सरकारपुढे मोठे राजकीय आव्हान उभे राहिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भाजपसाठी तरुण मतदारांचे महत्त्व, परीक्षा गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांचा वाढता संताप, तसेच बेरोजगारी आणि मर्यादित रोजगारसंधी या मुद्द्यांवरही रॉयटर्सने लक्ष केंद्रित केले.
'सीएनएन'ने प्रधान यांच्या राजीनाम्याचे वर्णन मोदी सरकारसमोरील 'दुर्मीळ आणि वाढते आव्हान' असे केले. रस्त्यावरच्या आंदोलनांना प्रतिसाद देणारे नेते म्हणून मोदी यांची ओळख नसल्याची नोंद करताना, या आंदोलनाचा संबंध केवळ प्रश्नपत्रिका फुटीपुरता मर्यादित नसून तरुणांमधील बेरोजगारी, सुशासन आणि उत्तरदायित्वाबाबतच्या वाढत्या चिंतेशी जोडला आहे.
'बीबीसी'ने या आंदोलनाचे वर्णन भारतातील अलीकडील काळातील सर्वांत मोठ्या विद्यार्थी नेतृत्वाखालील आंदोलनांपैकी एक असे केले. 'द गार्डियन'ने आंदोलनाच्या राजकीय परिणामांपेक्षा भारतातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मौनावर अधिक भर दिला. 'अल जझिरा'ने या आंदोलनाचे वर्णन मोदी सरकारविरोधातील अलीकडील सर्वाधिक ठळक सार्वजनिक असंतोष म्हणून केले. शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सुरू झालेले आंदोलन पुढे बेरोजगारी, भ्रष्टाचार, सुशासनाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले.
विद्यापीठांच्या चौकटीबाहेर गेलेले आंदोलन
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने हे आंदोलन भारतातील अलीकडील काळातील सर्वांत मोठ्या रस्त्यावरील आंदोलनांपैकी एक असल्याचे म्हटले. विद्यापीठांच्या परिसरापुरते मर्यादित न राहता या आंदोलनाला विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळाल्याचे वृत्तपत्राने नमूद केले. रोजगाराची टंचाई आणि प्रशासनातील त्रुटी यावरून 'भाजपने पूर्वी काँग्रेसवर टीका करताना जो नैतिक वरचढपणा दाखवला होता, तो आता गमावला आहे,' असे एका राजकीय विश्लेषकाचे विधान एससीएमपीने उद्धृत केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.