काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणूक आपण उमेदवार नसू असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकाचीस राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मंड्या जिल्ह्यातील केआरपेटे येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आगामी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असला तरी समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातून आपण दूर जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आपल्या निर्णयामागील कारण सांगताना सिद्धरामय्या म्हणाले की, सध्याच्या राजकारणात पैशाचा आणि भ्रष्टाचाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. "आमच्या काळात निवडणुका जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकवर्गणीत लढवल्या जात होत्या. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे २०२८ ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असे त्यांनी सांगितले. याशिवाय वाढते वय आणि प्रकृतीची साथ पूर्वीसारखी मिळत नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र, जनतेच्या प्रश्नांसाठी आपण पूर्वीप्रमाणेच काम करत राहू, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ आणि लोकांचा आवाज बनून कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांनी समर्थकांना दिली.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर आता त्यांनी आपण निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कारण सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केले असून आठ वर्षांहून अधिक काळ राज्याचे नेतृत्व केले आहे. राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.