अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी राज्यभर कारवाईचा धडका लावला आहे. मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे आणि कारवायांचे राज्यभर कौतुक होत आहेच पण, विधिमंडळातील देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी मुंढे यांच्या बदलीचा मुद्दा उपस्थित केला. किमान तीन वर्ष तरी त्यांची बदली करु नका, असे होणार का? असा प्रश्न पाटलांनी उपस्थित केला. यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिले.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले?
विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात अन्न व औषध प्रशासनशी निगडीत प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. यावेळी शिंदेसेनेचे पाचोऱ्याचे आमदार कैलास पाटील यांनी तुकाराम मुंढे यांचे कौतुक त्यांना किमान तीन वर्ष तरी या विभागात काम करु द्यावं अशी इच्छा बोलून दाखवली. "तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम सुरु केल्यापासून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील अवैध काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंची २५ वर्षाच्या सेवेमध्ये २७ वेळा बदली झालीय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या कारकिर्दीत त्यांना साजेसा विभाग मिळालाय", असं किशोर पाटील म्हणाले.
झिरवाळांना विचारला प्रश्न
"महाराष्ट्रातील सगळ्या बाळगोपाळांपासून ते माता-भगिनींपर्यंत जे आयुष्य बरबाद होणार होतं, ते वाचलेलं आहे किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेला हा विभाग मिळाला आहे. मुंढे यांची किमान तीन वर्ष तरी बदली होऊ नये. आमची तर इच्छा आहे की ते निवृत्त होऊपर्यंत हा विभाग त्यांच्याकडे असावा, पण किमान तीन वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का? असा माझा प्रश्न आहे", असं किशोर पाटील म्हणाले.
बदलीच्या प्रश्नावर झिरवाळांचे उत्तर
यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, "बदली हा विषयच येत नाही, कामकाज सुरळीत सुरु आहे, सुरळीत सुरु राहील", असे सांगितले. दरम्यान, यापूर्वी शिंदेसेनेचेच आमदार बच्चू कडूंनी देखील विधानपरिषदेत तुकाराम मुंढेंचे कौतुक केले होते. त्यांनी देखील मुंढेंना किमान एक वर्षतरी पदावर ठेवण्याची मागणी केली होती. "सरकारला जमले नाही ते एका अधिकाऱ्याने करुन दाखवले," असेही कडू म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.