"आमदाराच्या बायकोची संपादकाला धमकी!" जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ, रोख नेमका कोणाकडे?
आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून ती कोणत्या आमदाराची बायको आहे हे पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी सांगावं, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
त्यामुळे हा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे. दूध भेसळ मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांचा रोख कोणत्या आमदाराकडे? अशी चर्चा रंगली आहे.
विकास कसा वाहून गेला ते आपण पाहिलं
जयंत पाटील म्हणाले की, या अधिवेशनात आपण काय बघितलं? तर सभागृहात मंत्री बसत नाहीत. अधिवेशनात अधिकारी येत नाही. सभागृहात काही देणघेण नाही, असं सगळं सुरु आहे. विकास कसा वाहून गेला ते आपण पाहिलं. एक नगरसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कसं मारतो हे ही पाहिलं.
महाराष्ट्र आता बिहार झालाय का?
त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत पोचला हे तुम्ही सांगावं. त्यांच्या तपासात नेमकं काय काय झालं हे कुठे येत नाही. अजित पवार यांचं स्मारक करणार असं बोलले पण त्यांचं पुढं काय झालं ते माहिती नाही. ते पुढे म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल असं वाटलं होतं कारण खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण तसं घडलं नाही. माझ्या मतदारसंघात एकाला गोळी घालून ठार केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. तो कोण आमदार आहे ज्याने पोलिसांना गुन्हा दाखल होण्यापासून थांबवलं याची माहिती घ्या, कॉल रेकॉर्ड तपासा. महाराष्ट्र आता बिहार झालाय का?
लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडाला
ते पुढे म्हणाले की, ठाण्यात जमील शेख यांची गोळ्या घालून हत्या झाली. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमणूक करू असं सांगितलं. नागपूरबद्दल काही बोलले की परत म्हणाल की नागपूरची बदनामी करतोय, पण कोट्यवधी रूपयांची तडजोड करून पोलिस बुकींना सोडून देतात. 500 रूपयांसाठी 9 पोलिसांवर निलंबित कारवाई होती. ते म्हणाले, लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. टेबलावर ३ पत्ता खेळायचा फोटो मी पाठवले पण पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे. सगळीकडे हप्तेखोरी चालू आहे. साताऱ्यात काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. शंभुराजे यांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं गेलं, पण तरीही खुर्चीसाठी खाली मान घालून बसायला लागत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, शंभुराजे यांच्या हाताला दुखापत झाली तेव्हा ते हात वर करून सांगत होते. आता, मात्र कमी झाले आहेत वरून दम दिल्याच कळलं. पोलिसांना हाताशी धरण्याचा हा प्रकार असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.