राजस्थानच्या अलवरमध्ये २०१६ साली झालेल्या निवडणुकांच्या वादातून मोठी दुर्घटना घडली. एका व्यक्तीचा कट रचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी तब्बल १० वर्षांनंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये माजी भाजप जिल्हाध्यक्ष इंदरजीत सिंह पाटा आणि त्यांच्या कुटुंबातील आणखी आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सरपंच निवडणुकीतील वादातून झालेल्या या हत्येप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अनंत भंडारी यांनी 22 साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर हा निकाल दिला. या प्रकरणातील इतर दोषींमध्ये अनुप सिंह, कमलजीत सिंह, गुरवचन सिंह, जसपाल सिंह, कुलवंत सिंह, अमन सिंह, हरविंदर सिंह आणि विश्वेंद्र सिंह यांचा समावेश आहे.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, १० जून २०१६ रोजी संध्याकाळी अवतार सिंह हे नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटा गावात एका दुकानासमोर बसले होते. त्यावेळी ८ ते १० जणांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांकडे हातोडे, तलवारी, चाकू, लोखंडी पाइप, हॉकी स्टिक आणि लाठ्या असल्याचे तपासात समोर आले.
प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे हत्या
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवतार सिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास पूर्ण करून सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र सादर केले. दरम्यान, मृत अवतार सिंह यांचा मुलगा अजयपाल यांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. वडिलांनी सरपंच निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची हत्या केल्याचं त्यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.