"आम्ही सर्व काही मॅनेज करू" पोलिसांच्या नावाने ज्वेलर्सकडून ४ लाख रुपये खंडणी उकळली, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
अंबरनाथ :-पोलिसांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोन जणांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. संजय प्रसाद आणि तेजस सरवदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी एका ज्वेलर्स व्यापाऱ्याकडून पोलिसांना मॅनेज करण्याच्या नावाखाली तब्बल ४ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. यानंतर एका पान टपरी चालकाला धमकावत त्याच्याकडूनही ७ हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ज्वेलर्स व्यापाऱ्यावर यापूर्वी जुना गुन्हा दाखल होता. याचाच फायदा घेत संजय प्रसाद आणि तेजस सरवदे यांनी व्यापाऱ्याशी संपर्क साधला. पोलिसांमध्ये आमची ओळख असून, आम्ही सर्व काही मॅनेज करू शकतो, अशी बतावणी त्यांनी केली. तुझ्यावर कोणतीही कारवाई होऊ देणार नाही, तसेच तुझ्यावरील प्रकरणे मिटवून देऊ, असे सांगत दोघांनी व्यापाऱ्याकडून ४ लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांच्या नावाचा धाक दाखवत ही रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप आहे.
ज्वेलर्सनंतर या दोघांनी एका पान टपरी चालकाला लक्ष्य केले. तू गुटख्याची विक्री करत असल्याने तुझी तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) करू, अशी धमकी त्यांनी दिली. कारवाईची भीती दाखवत आरोपींनी पान टपरी चालकाकडून ७ हजार रुपये घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दोन्ही घटनांनंतर संबंधितांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारींची दखल घेत पोलिसांनी खंडणीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. तपासादरम्यान संजय प्रसाद आणि तेजस सरवदे यांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, या दोघांविरोधात यापूर्वीही एका बिल्डरची पालिकेत तक्रार करून त्याच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या आरोपींनी आणखी कोणाकडून अशाच प्रकारे पैसे उकळले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी माहिती दिली असून, दोन्ही आरोपींविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.