सांगली : सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून कडक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील मिठाई, खवा, फरसाण, चिवडा यासारख्या विविध अन्नपदार्थांच्या उत्पादक व विक्रेत्यांवरही कारवाई केली जात आहे.
एक एप्रिल ते ऑगस्ट दरम्यानच्या कारवाईत तब्बल दोन कोटींहून अधिक रकमेचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. एक एप्रिल ते ऑगस्ट अखेर पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ५४३ अन्न व्यावसायिकांची सखोल तपासणी करण्यात आली. या कारवाईवेळी भेसळीचा संशय आणि गुणवत्तेच्या तपासणीसाठी ३९२ अन्न नमुने गोळा करून ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अस्वच्छता आढळलेल्या २०८ अन्न व्यावसायिकांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देणाऱ्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी ३१ अन्न व्यावसायिकांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीवेळी २४ अन्न आस्थापनांमधून अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ९२ लाख ५३ हजार १२९ रुपये किमतीचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यात गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू आदी प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर देखील धाडी टाकण्यात आल्या आहेत. जिल्हाभरात ४५ ठिकाणी विशेष धाडी टाकून १ कोटी १७ लाख ६२ हजार १३४ रुपये मूल्याचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पथकाने संपूर्ण मोहिमेत मिळून एकूण २ कोटी १० लाख १५ हजार २६३ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे.
सणासुदीच्या काळात करडी नजर सणांच्या काळात खवा, मिठाई, तेल आणि दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. याचा फायदा घेऊन काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणातच पदार्थ तयार करून शिळे पदार्थ न विकण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. तसेच परवाना किंवा नोंदणीशिवाय कोणताही अन्न व्यवसाय करू नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे. महाप्रसादावरही कडक निर्बंध आगामी सणांच्या काळात महाप्रसाद तयार करण्यासाठी केटरर नियुक्त करताना तो परवानाधारक किंवा नोंदणीधारक असल्याची खात्री मंडळांनी करावी.महाप्रसाद बनवताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करून अन्नविषबाधेसारखे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भेसळीची तक्रार कोठे कराल? ग्राहकांनी मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. कुठेही भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रा. अ. समुद्रे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.