मिरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदे गटाचे आमदार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांवर हल्लाबोल करताना थेट 35 वर्षांचा काळ काढला. भाजप आमदार मेहता यांनी मंत्री सरनाईक हे बालिशपणा करत असल्याची टीका केली. भाजप आमदार मेहता यांच्या टीकेला आता मंत्री प्रताप सरनाईक काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता व सेव्हन इलेव्हन कंपनीवर जोरदार हल्लाबोल केला होता. प्रताप सरनाईक यांच्या आरोपांना आता आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री सारखा व्यक्ती एवढा बालिशपणा कसा करू शकतो, अशा शब्दात मेहता यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलं. भुर्जी विकणारा व्यक्ती मंत्री होऊ शकतो, तर एक पोलीस अधिकारी विकासक का होऊ शकत नाही, असा सवाल आमदार मेहता यांनी रविंद्र सावंत यांच्यावरून केला. सरनाईक यांनी उल्लेख केलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा माझ्याशी आणि माझ्या कंपनीशी काही एक संबंध नाही, असे स्पष्टीकरण मेहता यांनी दिले.'ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा सरनाईक यांनी उल्लेख केला, तो मीरा भाईंदरमध्ये विकासक असून त्याच्या जागेला लागूनच सरनाईक यांची जागा आहे. मात्र ती जागा न मिळाल्याने गेल्या 35 वर्षांपासून माहीत असलेल्या विकासकाचा पोलीस असल्याचा उल्लेख सरनाईक यांनी का केला? रवींद्र सावंत हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना त्यांच्याकडे 20 कोटी कुठून आले, हे त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे, त्याबाबत आम्ही माहिती कशी देणार? असा सवाल मेहता यांनी केला. सरनाईक यांच्यावर जनतेचा विश्वास कमी आहे, यासाठी महापालिका निवडणुकीत त्यांचे फक्त ३ नगरसेवक निवडून आले आहे. त्यांच्या जागा कमी आल्या म्हणून त्यांनी त्याबाबत चिंतन करावे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून महापालिकेमध्ये आमची सत्ता आली, असे मेहता यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.