🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाप बाप राहिला नाही, आई आई राहिली नाही! इंदापुरात जमिनीच्या वादातून मुलांचं आई-वडिलांवर काठ्यांनी तांडव!

बाप बाप राहिला नाही, आई आई राहिली नाही! इंदापुरात जमिनीच्या वादातून मुलांचं आई-वडिलांवर काठ्यांनी तांडव!


इंदापूरमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी दोन मुलांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच काठ्यांनी मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान तरंगवाडी परिसरात सलीम लॉन्सजवळ घडली.

याप्रकरणी वडील तुकाराम किसन राऊत (वय ६५) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तुकाराम राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांच्या पत्नी अंजना राऊत रस्त्यावरून पायी जात होते. तेव्हा त्यांचे मुलगे संजय आणि राजेंद्र तुकाराम राऊत टाटा नेक्सॉन गाडीतून आले आणि त्यांनी दोघांना रस्त्यात अडवलं. आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या विक्रीवरून मुलांनी आई-वडिलांना जाब विचारला आणि ती जमीन परत नावावर करण्याची मागणी केली.

या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जमीन नावावर केली नाही तर बघून घेऊ, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या मारहाणीत अंजना यांच्या उजव्या मनगटाला आणि कमरेला, तर तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, चेहऱ्यावर, मांडीवर आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना बोलावलं आणि जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर तुकाराम राऊत यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून पोलिसांनी संजय आणि राजेंद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हे सर्व आरोप वडिलांनी दिलेल्या तक्रारीवर आधारित आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अद्याप कोणीही दोषी आढळलेलं नाही. या कथित हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस या व्हिडिओच्या सत्यतेची आणि नेमक्या परिस्थितीची चौकशी करत आहेत, असंही समजतंय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.