राष्ट्रीय कुस्तीपट्टू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूबाबबत खळबळजनक माहिती समोर
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील राष्ट्रीय महिला कुस्तीपटू आणि एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून सुमारे 100 फूट खोल दरीत उडी मारल्याची घटना घडली.
या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. अडीच वर्षांची मुलगी क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी एक अडीच वर्षांचे मूल सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
वडिलांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
या घटनेनंतर अश्विनी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. अश्विनी यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाचा आरोप करण्यात आला आहे.
अश्विनी यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, पती, सासू आणि सासरे यांच्याकडून मुलीला त्रास दिला जात होता. फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माहेरी आल्यानंतरही अश्विनी यांना फोनवरून मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'मागील तीन महिन्यांपासून माझ्याकडेच राहत होती'
अश्विनी यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी मागील तीन महिन्यांपासून माहेरीच राहत होती. मागील काही दिवसांत तिच्यासोबत नेमके काय घडले, याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
"आम्ही तिला सतत समजावून सांगत होतो. मात्र सासरच्या मंडळींकडून तिला धमक्या दिल्या जात होत्या," असा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत एफआयआर दाखल केली असून, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
वडिलांनीच दिले कुस्तीचे धडे
अश्विनी पौळ यांच्या कुस्तीच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा होता. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक असून त्यांनाही कुस्तीची आवड आहे. लहानपणापासूनच त्यांनी अश्विनी यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. मुलीची कुस्तीतील जिद्द पाहून त्यांनी घराजवळच तिच्यासाठी सरावाची व्यवस्था केली. कठोर मेहनतीच्या जोरावर अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती.
अश्विनी पौळ यांची कुस्तीतील उल्लेखनीय कामगिरी
अश्विनी यांनी 2007 मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर 2008 आणि 2009 मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवत आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली होती.
राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या या कुस्तीपटूच्या आयुष्याचा अशा पद्धतीने झालेला दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अश्विनी यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासानंतर या प्रकरणातील नेमके सत्य समोर येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.