सांगली: शहरातील अमरधाम स्मशानभूमीलगतच्या कृष्णा नदीजवळील बंधाऱ्यालगत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धवट जळालेला मानवी पाय भटक्या कुत्र्यांनी 'कृष्णा'काठच्या बंधाऱ्याजवळ टाकल्याचे दिसून आले. वन्यजीवरक्षक सुनील कपाळे यांच्या ही बाब लक्षात आली. यानिमित्ताने येथील अमरधाम स्मशानभूमीतील अक्षम्य गैरकारभार पुन्हा एकदा पुढे आला आहे.
यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आले आहेत. अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पूर्णतः जळाले आहेत की नाही, याची कर्मचारी खात्री करीत नाहीत. स्मशानभूमीचा परिसरातील कुत्र्यांचा वावर नियंत्रित करता येईल, अशी कुंपण व्यवस्था करणे गरजेचे आहे. नेहमीच प्रसादाच्या अपेक्षेने भर गर्दीत इथे कुत्री रेंगाळतात. याबाबत कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित असताना त्याबाबत गांभीर्य दाखवले जात नाही.याबाबत श्री. कपाळे म्हणाले, ''बंधाऱ्याच्या परिसरातून कामाला जात असताना स्मशानभूमीपासून काही अंतरावर अर्धवट जळालेला पाय आढळला. मी ही माहिती सांगलीवाडीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांना दिली. त्यांनी पालिकेतील मुकादमांना कल्पना दिली. त्यांनी तत्काळ दखल घेत अवयवाची विल्हेवाट लावली. ही घटना अतिशय गंभीर आहे. मोकाट कुत्र्यांचा इथला वावर रोखण्यासाठी तातडीने उपाय करावेत.''
जीवाची किंमत शून्य
सांगलीत चार वर्षांच्या बाळावर दिवसाढवळ्या कुत्र्याने हल्ला करून चेहऱ्याचे लचके तोडले. इतकी गंभीर घटना होऊनही महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतलली नाही. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न आलेला आहे, खरे तर गेली ३० वर्षे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिका प्रशासन असो किंवा त्यांचे नगरसेवक, अधिकारी असोत, कोणालाही उपाय करता आलेला नाही. व्यंकटेशनगर येथील न्यू प्राइड थिएटरच्या मागील बाजूस ही घटना घडली. शहरातील मुख्य भाग बदाम चौक गेली २५ वर्षे भटक्या कुत्र्यांच्या झोनमध्येच आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.