भारत अमेरिकेतील करारामुळे देशाच्या आर्थिक धोरणांवर मोठा परिणाम होणार आहे. यापुढे अमेरिकाच भारताचे धोरण ठरवेल. या कराराच्या माध्यमातून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनातील सरकारने भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
निर्यात शुल्काबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले, पूर्वी अमेरिकेकडे फक्त अडीच टक्के निर्यात शुल्क लागत होते. आता १८ टक्के शुल्क लागणार असून आयात वस्तूवर शून्य टक्के शुल्क लागेल. सरकारने केलेल्या करारानुसार अमेरिका उद्योग, आर्थिक धोरणावर सुद्धा लक्ष ठेवेल. तेच धोरण निश्चित करतील. आज कृषी व्यतिरिक्त इतर विषयावर विरोधक बोलत नाही याविषयीची खंत व्यक्त करीत त्यांनी यावर बोलते होण्याचे आवाहनही केले.दरम्यान, एपस्टीन फाइलवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्लॅकमेल होत आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. एपस्टीन फाइलमध्ये नाव आलेल्यांवर विदेशात कारवाई होत आहे. भारतातील तीन जणांचे नाव आले, परंतु एकावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री मोदी यांच्या राजीनाम्यासाठी २ मार्चला मुंबईत आंदोलन करण्यात येणार असून यात सर्व विरोधी पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.आपल्याला रशियाकडून स्वस्तात तेल मिळत होते. मात्र, तेल खरेदी भारताने बंद केले. अमेरिकेच्या सांगण्यावरून इतर ठिकाणाहून तेल खरेदी करण्यात येत आहे. रशियाचे स्वस्त तेल खरेदी करणे का बंद करण्यात आले, याचा खुलासा करावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. भविष्यात इराणसोबत युद्ध झाल्यास अमेरिका भारताच्या भूमीचा उपयोग विमान उतरविण्यास किंवा तेल भरण्यास करेल. त्यामुळे या युद्धात भारताचा अप्रत्यक्ष सहभाग असणार आहे. भारताला यातून दूर राहण्याचे स्वातंत्र्य नसेल अशी टीका आंबेडकर यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.