मोठी बातमी : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, प्रदेशाध्यक्षही ठरला
होता, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेचा तपशील ABP माझाच्या हाती.
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर काय ठरलं होतं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झाल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार होते. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद तर राज्याच्या मंत्रिमंडळात शरद पवार गटाचा एक नेता असा प्रस्ताव होता. तसेच प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार होते असं अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत ठरल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा
पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार गटाच्या
नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अंतिम चर्चा झाली होती असा
दावा केला आहे. तशी एक बैठक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाल्याची
माहितीही आता समोर आली आहे. जयंत
पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी 23 डिसेंबर रोजी एक बैठक झाली होती.
त्या बैठकीला शरद पवार गटाचे 14 नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांन दिली.
काय प्रस्ताव होता?
शरद पवार गटाच्या 14 नेत्यांची आणि अजित पवार यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी महायुतीमध्ये सहभागी व्हायचं असं ठरलं होतं. केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद तर राज्यामध्ये शरद पवार गटाच्या एका नेत्याला मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार होते.दोन्ही राष्ट्रवादीमध्ये या संबंधी एक अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आधी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कराडमध्ये एक बैठकही झाली होती. अजित पवार यांच्याकडून फक्त ते स्वतः चर्चा करायचे. तर शरद पवार यांच्याकडून सर्व प्रमुख नेते उपस्थित असल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाच्या नेत्यांना कल्पना नाही
दुसरीकडे,
अजित पवार गटाच्या नेत्यांना याची काही माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना विलिनीकरणाच्या चर्चेची माहिती झाली तर
काय असा प्रश्न शरद पवार गटाच्या नेत्यांनी विचारला. त्यावर 'मी पक्ष
चालवतोय, मी बघून घेईन' असं खड्या आवाजात अजित पवारांनी सुनावल्याची माहिती
आहे. आता
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटाकडून शरद पवार गटाचा हा दावा
फेटाळण्यात येत आहे. तर असं जर विलिनीकरण करायचं असेल तर आधी भाजपला
विचारावं लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.