राज्याच्या दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यासाठी त्यांनी राज्याच्या 40 विभागांकडून माहिती त्यांनी मागवली होती. पण त्यातील दोनच विभागांनी माहिती सादर केली. 38 विभागांनी माहिती सादर केली नसल्याची माहिती समोर आली. त्यावरून माजी
मंत्री बच्चू कडू यांनी, तुकाराम मुंढे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
उपस्थित केला आहे. 'मुंढे दिव्यांग विभागाचे सचिव झाल्यानंतर ते मंत्रालय
वेगवान चालत असे वाटलं होतं. पण ते त्यांच्या तोऱ्यात आहे,' असा घणाघात
बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, "दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले. यानंतर तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिव, आयुक्त म्हणून कारभार आला. यानंतर हे मंत्रालयाचे कामकाज वेगवान होईल, असे वाटत होते. पण मुंढेसाहेब सध्या त्यांच्याच तोऱ्यात आहेत. दोन-तीन अपंग त्यांच्याकडे गेल्यावर, त्यांनी त्यांना रजिस्टेशन आहे का? भांडण्याचा अधिकार आहे का? असे प्रश्न केले."'दिव्यांग मंत्रालयाकडे सचिवांचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. कोणीच कामी येत नाही, असे म्हटल्यावर अधिकाऱ्यांनी मेळघाट आणि गडचिरोलीकडे पाठवले जाते, तशी गत सध्या दिव्यांग मंत्रालयाची झाली आहे. त्यात बदल गरजेचा आहे,' अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली. 'दिव्यांग मंत्रालयाची चूक आहे, पाठपुरावा केला पाहिजे, हे आम्ही पूर्वीच सांगितलं आहे. आंदोलनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील मान्य केलं आहे. प्रोसिडिंगला घेतलं आहे, पण कारवाई होत नाही, याचे दुःख आहे. दिव्यांगासाठी सद्भावना जीआर आलेला आहे. धार्मिक भाव जपला जातो. पण सेवा भाव का जपला जात नाही. त्यामुळे विभागावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करू,' असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
प्रत्येक खात्यात घुसखोरी
दरम्यान, अमरावती इथल्या कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीप्रकरणावर, राज्यकर्त्यांना आता या गोष्टीचे काहीही घेणे देणे राहिले नाही. राज्यात एकही डिपार्टमेंट चांगलं नाही, एकही काम चांगलं होत नाही, सगळीकडे घुसखोरी सुरू आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
चोरांचं खुपिया खातं जोरात
'मंत्र्यांच
रेतीकडे लक्ष आहे, अमरावतीचे पालकमंत्री असो की, राज्याचे
मुख्यमंत्री-गृहमंत्री असताना देखील त्यांचा दरारा पाहिजे होता, तो दरारा
संपलेला आहे. चोरांचा दरारा वाढलेला आहे. चोरांचं खुपिया खातं किती चांगल
आहे, कोण न्यायाधीश घरी नाही, हे चोरांना माहिती आहे,' अशी उपहासात्मक
टिप्पणी बच्चू कडू यांनी केली.
फडणवीसांनी हनुमानासारखं वागावं
'अमरावतीचे पोलिस आयुक्त काय करत आहे? कोणाकडून किती हप्ते घ्यायचे, याकडे लक्ष आहे का? का तुम्हाला चोर सापडत नाही. न्यायाधीशांच्या घरी जर चोरी होत असेल, तर चोरांना माहित आहे की, यंत्रणा कुचकामी झाली आहे. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे. देवेंद्र फडणवीस हे राम राज्याचे पाईक आहे. त्यामुळे त्यांनी हनुमानासारखं वागलं पाहिजे,' असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.