टेंभुर्णी : गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलिसांच्या पथकावरच आरोपींनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना माढा तालुक्यातील चौभे-पिंपरी येथे घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील एपीआय गणेश चौधरी व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने हे पोलीस स्टाफसह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी चौभे-पिंपरी येथे गेले होते. यावेळी तीन सख्ख्या भावांनी संगनमत करून पोलिसांशी हुज्जत घालत झटापट केली. आरोपी अक्षय भगवान जाधव याने पोलिस प्रशांत मदने यांच्या शर्टाला धरून त्यांना उचलून जोरात जमिनीवर आदळले. तर आरोपी अमर भगवान जाधव याने एपीआय गणेश चौधरी यांच्या गळ्याला धरून ढकलून दिले.
या झटापटीत पोसई मदने यांच्या शर्टाची बटणे तुटली असून त्यांना मुका मार लागला आहे. तसेच आरोपींनी पोलिसांना धमकावत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. आरोपी अमर जाधव याने घटनास्थळी असलेली लहान मुलांची सायकल उचलून पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केल्याचीही नोंद आहे. अटक प्रक्रियेस तीव्र विरोध करत पोलिसांवर हल्ला करण्यात आला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० ते ३.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अक्षय भगवान जाधव, अमर भगवान जाधव व सागर भगवान जाधव (रा. जाधव वस्ती, चौभे-पिंपरी, ता. माढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंड संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. सदर घटनेप्रकरणी एपीआय गणेश बाबाजी चौधरी (वय ४१) यांनी फिर्याद दिली असून पोहेकॉ एन. जे. काशिद यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सध्या पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित डी. पवार अधिक तपास करत आहेत.उल्लेखनीय म्हणजे, गेल्या एका महिन्यात पोलिसांवर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २ जानेवारी रोजी आलेगाव बु. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे "पोलिसांचा धाक उरला आहे का?" असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.