शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवसा 12 तास मोफत वीजपुरवठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी इथल्या महात्मा फुले कषी विद्यापीठाच्या 39 वा पदवीदान समारंभात शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, कृषीमंत्री दत्ता भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.
इंटरनॅशनल सोरल अलायंस यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला,जगातील सर्वात मोठी वितरक सोलर योजना म्हणून मान्यता दिली. यातून 16 हजार मेगावॅट वीज तयार केली. शेतकरी कंपनी तयार केली असून, त्यामार्फत वीज वितरण सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.'या वर्षाअखेर 14 हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. आता राज्यातील सुमारे 65 टक्के शेतकऱ्यांना, दिवसा 12 तासांची वीज देणं सुरू केलं आहे. काही ठिकाणी दहा तास देत आहोत. या वर्षाच्या शेवटीनंतर, पुढच्या वर्षांपासून शेतकऱ्यांना, दिवसा 12 तास वीज, ती पण मोफत दिली जाईल,' अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
वातावरणातील बदलावर संशोधनाची गरज
'वातावरणातील बदलामुळे शेती उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. वातावरणाचा परिमाण होणार नाही, असे वाण तयार करणे गरजेचे आहे. आपली माती खराब होणार नाही, यासाठी संशोधन गरजेचे आहे,' याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
AIचा वापरावर भर
राज्यात 78 टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी संशोधनाची गरज आहे. राज्यातील 10 हजार गावांमध्ये क्लायमेट फ्रुफ शेती सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारण्याचा आमचा प्रयत्न असून, यासाठी AIचा वापरावर पुढील काळात अधिक भर राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.
कर्जमाफीत अडकून पडू नका
याशिवाय राज्यात 1 कोटी 30 लाख शेतकऱ्यांचे डिजिटायजेशन सुरू आहे. AI तंत्रज्ञान आणि कृषी विद्यापीठांच्या योगदानातून शेतकऱ्यांना परवडेल, असे शेतीचे मॉडेल उभे करायचे आहे. खूप परिवर्तन करायचे आहे. आपण कर्जमाफी दिली. मात्र शेतकऱ्यांना कायस्वरुपी यातून बाहेर काढायचे असेल तर, कृषी क्षेत्रात मोठे बदल करावे लागतील. यासाठी विद्यापीठांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
