अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत राज्य शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत वाढ करत ५ वी ते ७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २५० रुपये, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ४०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
ही सुधारित वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दिली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री शिरसाट यांनी ही माहिती दिली.सध्याची शिष्यवृत्तीची रक्कम तुटपुंजी असल्याची कबुली मंत्री शिरसाट यांनी दिली. सध्या ५ वी ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दरमहा ६० रुपये दिले जात आहे, मात्र आता दरमहा २५० रुपयांप्रमाणे देण्यात येतील, तर ८वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रुपयांवरून ४०० रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला असल्याचं शिरसाट म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या आत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येणार असल्याचेही शिरसाट म्हणाले. पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मान्यता मिळताच यावर्षीपासून सुधारित शिष्यवृत्ती लागू करण्यात येईल, असेही शिरसाट यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
