"५० आमदार आणि 'ते' नाव... ठाकरेंच्या खासदाराने सांगितली महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!"
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मोठी अस्वस्थता असल्याची कुजुबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान,आता महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदाराकडून करण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यापूर्वी अचानकच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्धवट सोडून दिल्लीला गेले होते. यानंतर आता काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार याही बुधवारी (ता.1 एप्रिल) रोजी दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. शिंदेंप्रमाणेच सुनेत्रा पवारही एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.
राज्यसभा खासदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी गुरुवारी (ता.2 एप्रिल) राज्याच्या राजकारणात नवा बॉम्ब टाकला आहे. यावेळी त्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अन् एकनाथ शिंदेंची शिवसेनेतील 25-25 असे एकूण 50 फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मोठे संकेतही राऊतांनी यावेळी दिले आहेत.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 25-30 आमदार आणि त्याचबरोबर शिंदे गटातील तितकेच आमदार, म्हणजेच 25 -25 आमदार हे भाजपमध्ये जातील. हे सर्व आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत असून त्यांना काही काळ वेट अँड वॉच सांगण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.संजय राऊतांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांना विलीन व्हावंच लागणार आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, मी वारंवार हे सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे आणि सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा पवारांचे ते सहकारी असतीलच असे नाही,असंही खळबळजनक विधान राऊतांनी यावेळी केलं आहे.
'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा
एकीकडे राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर डिप्लोमसीला उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच तिकडे उद्धव ठाकरेंनी तात्काळ आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून घेतलं. मात्र, या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अशातच आता ठाकरेंच्या आणखी दोन खासदारांनी थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डीनर डिप्लोमसीला उपस्थिती लावल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.
अशातच आता ठाकरेंच्या आणखी दोन खासदारांनी थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डीनर डिप्लोमसीला उपस्थिती लावल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख हे प्रतापराव जाधव यांच्या डीनर डिप्लोमसीला उपस्थित होते. त्यामुळे आता हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.