"मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात हालचाली! ९ तास कोंडलेल्या अधिकाऱ्यांसाठी सरन्यायाधीश झाले 'ॲक्शन मोड'मध्ये."
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच खळबळजनक घटना समोर आली आहे. मालदा जिल्ह्यामध्ये मतदारयाद्या पुनर्पडताळणी (SIR) प्रक्रियेतील सात न्यायालयीन अधिकाऱ्यांना तब्बल नऊ तास कोंडून ठेवल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या घटनेवर स्वत: सरन्यायाधीश सूर्यकांत मध्यरात्री २ वाजेपर्यंत लक्ष ठेऊन होतो.
सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त केला. राज्य सरकारला फटाकरतानाच त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगालाही अधिकाऱ्यांना केंद्रीय सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले. मध्यरात्री घडलेली घटना म्हणजे एसआयआर प्रक्रिया रोखण्याचे पुर्वनियोजित षडयंत्र होते. बंगाल हे सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य असल्याची टिप्पणीही सरन्यायाधीशांनी केली.
नेमकं काय घडलं?
मालदामधील कालियाकच येथील गट विकास अधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी दुपारी मोठे आंदोलन सुरू झाले. एसआयआरमधून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आल्याने मतदारांकडून रोष व्यक्त केला जात होता. सुरूवातीला मतदारांसोबत न्यायालयीन अधिकाऱ्यांची बैठक झाली. पण त्यातून तोडगा न निघाल्याने आक्रमक आंदोलकांनी कार्यालयाला घेराव घालत अधिकाऱ्यांना कोंडले. यामध्ये तीन महिला अधिकारीही होत्या.
तब्बल नऊ तास आंदोलकांनी कार्यालयाला घेराव घातला होता. त्यानंतर मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांना घेऊन जात असलेल्या पोलिसांच्या वाहनांवरही आंदोलकांनी दगडफेक केली. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. हे प्रकरण सरन्यायाधीश तसेस बंगाल हायकोर्टाच्या मुख्य न्यायमुर्तींपर्यंत पोहोचले होते.खुद्द सरन्यायाधीशांनी आज कोर्टात याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगालच्या महाधिकवक्त्यांना उद्देशून बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, तुमच्या राज्यात प्रत्येकजण राजकीय नजरेतून बोलत असतो, हे दुर्दैवी आहे. उपद्रवी कोण आहेत, हे आम्हाला माहिती नाही, असे वाटते का? मी रात्री २ वाजेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर नजर ठेऊन होतो. ही खूपच दुर्दैवी घटना आहे.
सरन्यायाधीशांनी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव डीजीपी आणि जिल्हा न्यायाधीशांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कडक शब्दांत कान उपटले. आधीपासूनच माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याची नाराजी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली. रात्री ८.३० वाजेपर्यंत काहीच हालचाल झाली नाही. बंगालच्या मुख्य न्यायमूर्तींनी राज्याचे डीजीपी आणि गृह सचिवांना बोलवून घ्यावे लागल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.