दिघा परिसरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दहशतीच्या जोरावर अमली पदार्थाचे साम्राज्य चालवणाऱ्या शांताबाई करंडेकर टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी बीमोड केला आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अमली पदार्थांच्या विक्रीतून उभ्या केलेल्या बेकायदा मालमत्तेवर नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी (ता. २९) धडक कारवाई करीत बुलडोझर फिरवला आहे.
गुन्हेगारी विश्वातून कमावलेल्या पैशातून दिघ्यात उभारलेली दोनमजली इमारत पोलिसांनी जमीनदोस्त केली असून, नवी मुंबईतील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. शांताबाई करंडेकर आणि तिचे नाईक कुटुंबातील साथीदार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दिघा परिसरात अमली पदार्थांचा धंदा चालवत होते.
मात्र अमली पदार्थविरोधी पथकाने नियोजनबद्धरीत्या या टोळीच्या ओमकार अपार्टमेंटवर नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकून या टोळीतील संशयितांना अटक केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या टोळीने दिघा परिसरात सात ते आठ वर्षांपासून दहशतीच्या जोरावर अमली पदार्थांचे साम्राज्य उभे केले होते.
या टोळीने संघटितपणे अमली पदार्थांची तस्करी केल्याचे तपासात आढळून आले. तसेच या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली होती. या टोळीची प्रमुख शांताबाई हिने अमली पदार्थ्यांच्या पैशातून दिघा येथे ३२ लाखांचे घर विकत घेऊन त्यावर बेकायदा दोनमजली बांधकाम केले होते. सिडकोने नोटीस बजावूनही ही जागा खाली न केल्याने बुधवारी पोलिसांनी फौजफाट्यासह ही इमारत रिकामी करत बांधकाम उद्ध्वस्त केले.
-राहुल धस, सहाय्यक पोलिस आयुक्त, रबाळे विभागकरंडेकर टोळीची प्रमुख शांताबाई करंडेकर ही आपल्या हस्तकांमार्फत अमली पदार्थांची तस्करी करीत होती. त्यांच्या विक्रीतून तिने बेकायदा मालमत्ता खरेदी केली होती. या टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर या महिलेने बेकायदा उभारलेल्या इमारतींबाबत सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर बुधवारी सिडकोच्या मदतीने या बेकायदा इमारतीवर तोडक कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.