शिरगुप्पी : विजापूर जिल्ह्यातील मोरटगी (ता.आलमेला) येथे गुरुवारी रात्री झालेल्या वळीव पावसामुळे रात्री उशिरा घराचे मातीचे छत कोसळून ढिगाऱ्याखाली एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जिल्हा प्रशासनातर्फे मातीच्या ढिगाऱ्याखालून बचाव कार्य मोहिमेत सर्वांचे मृतदेह हाती लागले असून, विजापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द केले.
या भीषण दुर्घटनेत मोरटगी गावातील गुरुनाथ बडिगेर (वय ३५), ज्योती बडिगेर (वय २८), कलाम्मा बडिगेर (वय १३) आणि कीर्ती बडिगेर (वय ९) यांचा मृत्यू झाला. मयत गुरुनाथ बडीगेरा यांची आई शांताबाई आणि दुसरा मुलगा वीरेश (वय १०) हे दोघे दुसऱ्या घरात झोपल्याने या अपघातातून बचावले. घराच्या दुरुस्तीमुळे गुरुनाथ बडीगेरा दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी ते आपल्या घरी परतणार होते. मात्र, या कुटुंबाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून त्या अगोदर मृत्यू झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी घटनास्थळी सिंदगीचे आमदार अशोक मनगुळी, माजी आमदार रमेश भूषणूर, जिल्हा पंचायत माजी सदस्य नरसिंग तिवारी, नेते अशोक वरदा, विजापूरचे जिल्हाधिकारी डॉ.आनंद के., जिल्हा पंचायत सीईओ ऋषी आनंद, जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, जिल्हा आरोग्य अधिकारी संपत कुमार गुणारी आणि महसूल, पोलिस व अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री यांच्याकडून मृतांना मदत जाहीर
पालकमंत्री एम.बी. पाटील यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंत्री एम.बी. पाटील म्हणाले, मृत्युमुखी पडलेल्या चौघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई म्हणून एकूण २० लाख रुपये दिले जातील व जिवंत राहिलेल्या वीरेश बडीगेर या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी मदत केली जाईल, असे त्याने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.