"नऊ वेळा माझं कुंकू विकलं गेलं!" बीडच्या लुटारू नवरीचा अंगावर शहारे आणणारा दावा; रॅकेटचा खरा चेहरा येणार समोर?
मराठवाडय़ातील गावाकडील अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लग्नानंतर त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरुणीला अटक केली असून तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
'मी नऊ लग्ने ही स्वखुशीने केली नाहीत, तर मला ती करायला भाग पाडलं आहे. यामागे चार जण असून त्यांनीच हे कृत्य करायला मला भाग पाडले आहे,' असा धक्कादायक खुलासा या तरुणीने केला आहे. या तरुणीचे नाव भारती गुमस्ते असे आहे.
भारतीने एक व्हिडीओ जारी केला असून यात ती म्हणतेय की, 'मला वडील नाहीत. फक्त आई आहे. पाच बहिणी आणि एक भाऊ आहे. माझ्या तीन बहिणींची लग्ने झालेली आहेत. माझ्या घरी फक्त माझी एक बहीण आणि आई असते. या सर्व प्रकरणात माझ्या बहिणीचा, भावाचा किंवा आईचा कोणताही संबंध नाही. अर्चना पाटील ही आमच्या गावात राहते. तिचा मुलगा सागर, गणेश अंदुरे आणि त्याची बायको राधा अंदुरे असे चौघे मिळून मला सतत धमकी द्यायचे. जर तू आम्ही सांगितलेल्या तरुणाशी लग्न केले नाहीस, तर आम्ही तुझ्या भावाला मारून टाकू. मला वडील नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या धमक्यांना बळी पडले आणि नऊ लग्ने केली,' असे भारतीने म्हटले आहे.
या चौघांनी मिळून माझे जबरदस्तीने 8 वेळा लग्ने केली. लग्न झालं की हे चौघे मला परत आणायचे. मी अनेकदा म्हटले की माझे लग्न झाले, आता मला राहू द्या. पण ते ऐकत नव्हते. मला सतत धमकी द्यायचे. मी लग्नानंतर अनेकदा नवऱ्याकडील मंडळीला खरे सांगायचा प्रयत्न केला. परंतु मला त्यात यश आले नाही. परंतु नववे लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याला माझा इन्स्टा आयडी मिळाला. त्यात त्याने मला सर्व खरं सांग असं म्हटलं. मी त्याला सर्व खरं सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.