Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांचा एल्गार! ‘शक्तीपीठ’विरोधात अरणमध्ये चाकं जाम; राजू शेट्टी आणि पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा!

शेतकऱ्यांचा एल्गार! ‘शक्तीपीठ’विरोधात अरणमध्ये चाकं जाम; राजू शेट्टी आणि पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा!


मोडनिंब : नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित 'शक्तिपीठ महामार्गा'वरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने महामार्गाच्या रेखांकनात काही बदल करून सुधारित अधिसूचना जारी केली असली, तरी नव्या आराखड्यात अनेक शेतजमिनी बाधित होत असल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत.
अरण (ता. माढा) येथे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर माजी खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रविवार, दि. १७/०५/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापूर-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 
नवीन आराखड्यानुसार माढा तालुक्यातील मानेगाव, चव्हाणवाडी, वाकाव, केवड, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, उपळाई (खु.), उपळाई (बु.), रोपळे, वडाचीवाडी, सोलंकरवाडी, बावी, मोडनिंब, अरण आणि तुळशी या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाची नेमकी गरज काय, असा सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांची पोलीस प्रशासनाबरोबर बाचाबाची झाली.

माढा व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी "शेती वाचवा, गाव वाचवा" व "जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची" अशी भूमिका घेत रस्ता रोको आंदोलन केले. अरण गावातील ७५ वर्षीय महिला शेतकरी रतन निवृत्ती पाटील यांनी तळपत्या उन्हात रस्त्यावर बसून आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
'शक्तिपीठ महामार्ग' हा सुमारे ८०० किलोमीटर लांबीचा सहापदरी दुतर्फा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान उभारला जाणार असून नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार असल्याची माहिती आहे.

या महामार्गामुळे शेकडो गावे, बागायती जमिनी, फळबागा आणि घरे बाधित होणार असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या महामार्गाची स्थानिक रहिवाशांना आवश्यकता नसल्याचा दावा केला. त्यांच्या मते, महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर बागायती जमिनी बाधित होणार असून शेतकऱ्यांना विस्थापित होण्याची वेळ येईल. तसेच, महामार्ग उंचावरून जाणार असल्याने गावांना व शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार नाही; उलट जमिनीचे दोन भाग होऊन शेती करणे अधिक अडचणीचे होईल. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारच्या मते, महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे व धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी हा महामार्ग उभारण्यात येत आहे. महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानी मंदिर माहूर येथील रेणुका माता मंदिर आणि सप्तशृंगी देवी मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांना या मार्गाद्वारे जोडले जाणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि औद्योगिक विकासालाही गती मिळेल.
"केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी होत असलेल्या या महामार्गाला आमचा विरोध असून, शक्तिपीठाच्या नावाखाली शेतजमिनी संपादित करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही," असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सोलापूर-पुणे महामार्गावरील अरण येथे रास्ता रोको आंदोलन करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार विजय कवडे यांना देण्यात आले. यावेळी मोडनिंब मंडळ अधिकारी बिभीषण वागज, अरणचे तलाठी शैलेश लोमटे तसेच सचिन पाटील, शिवाजी पाटील, अजित बारसकर, सिद्धेश्वर घुगे, अभिमान दगडे आणि एकनाथ सुर्वे आदी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.