राज्यावर 'बर्ड फ्लू'चे संकट! पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडे मोडणार? दीड लाख कोंबड्यांच्या कत्तलीची तयारी
नंदुरबार जिल्ह्याचं पोल्ट्री हब मानल्या जाणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने शिरकाव केलाय..त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडालीय.
काही दिवसांपूर्वी नंदूरबारच्या नवापूरमध्ये सहा पोल्ट्री फार्ममधील दीडशे ते दोनशे कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी थेट पशुसंवर्धन विभागात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूर मध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं समोर आलं.आता 1 किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरु केलीय..या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या कोंबड्यांना सामुहिकरित्या नष्ट केलं जाणार आहे. दुसरीकडे बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलंय. कलिंग प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
नवापूरसाठी बर्ड फ्ल्यूचं हे संकट नवीन नाही. याआधी नवापूरमध्ये दोनदा बर्ड फ्ल्यूनं थैमान घातलं होतं. 2010 ला राज्यात य़ाचं फ्ल्यूमुळे लाखो कोंबड्यांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.. त्यामुळे नवापूरमध्ये वारंवार होणाऱ्या बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडलेत.
एका बाजूला प्रशासन 'कलिंग' करून हा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतंय, तर दुसरीकडे लाखो रुपयांचं भांडवल डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहून पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झालेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं आता प्रश्न आहे तो, पोल्ट्री व्यावसायिकांच्या नुकसानभरपाईचा आणि भविष्यातील सुरक्षेचा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.