Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काटकसरीचे नवे पर्व! 'पुढील ६ महिने सरकारी सोहळे नाहीत'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.

काटकसरीचे नवे पर्व! 'पुढील ६ महिने सरकारी सोहळे नाहीत'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत करुन परकीय चलन वाचवण्याचं आवाहन केल्यानंतर राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या तफ्यातील गाड्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर घेण्यात आला. या निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये चक्क बुलेटवरुन दाखल झाल्याचं दिसून आलं. डोक्यावर हिरव्या रंगाचं हेल्मेट घालून बुलेट चालवत फडणवीस आज विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर नवनिर्वाचित विधान परिषद आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावून फडणवीस बुलेटवरुनच मंत्रालयाकडे रवाना झाला. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना बुलटेवरुन येण्याचं कारण सांगतानाच एक मोठी घोषणाही केली.

फडणवीस बुलेटने का आले? स्वत: सांगितलं

फडणवीसांनी बुलेटवरुन विधीमंडळात येण्यासंदर्भात बोलताना, "प्रतिकात्मकरित्या मी बुलेटवरून आलो. अधिक लोकांपर्यंत हे पोहचावे यासाठी मी आज बुलेट घेऊन विधीमंडळात आलो आहे," असं सांगितलं.

अत्यंत महत्त्वाची घोषणा
तसेच पुढे बोलताना, "उद्या साताऱ्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अगोदरच त्याचे नियोजन केल्याने तो रद्द केला नाही," असं फडणवीस म्हणाले. मात्र उद्याच्या कार्यक्रमाचा अपवाद वगळता, "मोठे (सरकारी) कार्यक्रम पुढील सहा महिने होणार नाहीत," अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केली.

इंदिरा गांधींनी हे असे...

मोदींनी केलेल्या आवाहनावरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा फडणवीसांनी समाचार घेतला. "विरोधी पक्षाला प्रगल्भता यावी लागेल. इतर देशांनी यापेक्षा कठोर निर्णय घेतले आहेत. इंदिरा गांधींनी हे असे निर्णय घेतले होते," अशी आठवण फडणवीसांनी करुन दिली.

ते बिनडोक आहेत
पंतप्रधान मोदी 15 मे पासून पाच देशांच्या दौऱ्यावर जात असल्याने भारतीयांना परदेश दौरे टाळा सांगत मोदी कसे काय परदेशात चाललेत? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यावर बोलताना फडणवीसांनी, "मुर्खपणाची आहे अशी टीका. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. अशी टीका करतात ते बिनडोक आहेत," अशा शब्दांमध्ये विरोधकांचा समाचार घेतला.
साताऱ्यात उद्या कोणता कार्यक्रम?

साताऱ्यातील ज्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उल्लेख केला त्याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी सविस्तर माहिती दिली आहे. उद्या म्हणजेच 15 मे रोजी साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमाला 50 हजार लाभार्थ्यांना न बोलवता 15 हजार लाभार्थ्यांना बोलवून काटकसर करून लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले. "प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. याच कार्यक्रमात योजनेच्या पुढील कामांसाठी तब्बल 10 हजार कोटी रुपयांच्या निधीचे वितरण उद्या 15 मे रोजी साताऱ्यात सैनिक स्कूल मैदानावर मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्यानंतर उद्याच्या सभेला देखील काटकसर करण्यात येणार आहे," अशी माहिती मंत्री गोरे यांनी दिली.

उद्या कोण कोण राहणार उपस्थित?
"50 हजार लाभार्थ्यांना न बोलवता उद्या 15 हजार लाभार्थ्यांना बोलवून काटकसर करून हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे," असं गोरेंनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. उद्या होणाऱ्या या सोहळ्यास केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रशासनाकडून या भव्य सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.