केतन गोयल प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. ज्या थक्क करणाऱ्या आहेत. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, सियाने केतनला लग्नाआधीच एटीएम मशीन बनवलं होतं. सियाने केतन कडून तब्बल 1 कोटी रुपये उकळले होते. सियाला केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. पण तिने साखरपुड्यानंतर पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, सियाला तीन वर्षांनंतर बॉयफ्रेंड चेतन याच्यासोबत लग्न करायचं होतं.
अशात योजनेनुसार, सियाने शॉपिंगचं कारण सांगत केतन याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपये घेतले आणि थेट चेतन याला दिले. चेतन या पैशांच्या जोरावर स्वतःचं करियर आणि व्यवसाय उभारणार होता. चेतन याने सियाला विश्वासात घेतलं आणि सांगितलं, पैसे मिळाल्यानंतर स्वतःच्या पायांवर उभा राहील, त्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतील… सिया आणि चेतन यांची योजन अशी होती की, केतन याच्या मृत्यूनंतर चेतन स्वतः सियाच्या कुटुंबियांना भेटणार होता आणि लग्नासाठी सियाच्या आई – वडिलांना विचारणार होता.
सिया गोयल हिने पोलिसांना काय सांगितलं
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासा दरम्यान सियाने सांगितल्यानुसार, सिया हिला केतन याच्यासोबत लग्न कधीच करायचं नव्हतं. केतनच्या निधनानंतर सिया हिला पुन्हा लग्न करण्यासाठी जवळपास दोन ते तीन वर्षांचा कालावधी आणखी मिळाला असता. तपासातून हे देखील समोर आलं की, लग्न रद्द केल्यास आपली बदनामी होईल, अशी भीती सिया आणि चेतन या दोघांनाही वाटत होती.
लोहगडावर नेमकं काय झालं?
दरम्यान, लोहगड किल्ल्यावर 26 वर्षीय केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी एक नवीन खुलासा केला आहे. केतनच्या हत्येसाठी एका विशिष्ट ‘सिग्नल’वर आधारित योजना आखण्यात आली होती, असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. सियाने बॉयफ्रेंड चेतनला अशी सूचना दिली होती की, ती खाली बसताच त्याने केतनला धक्का द्यावा. ठरलेल्या योजनेनुसार, सिया जमिनीवर बसली तो क्षण चेतनसाठी ‘सिग्नल’ ठरला; त्याने मागून येऊन केतन अग्रवालला कड्यावरून खाली ढकलून दिलं.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया दूर बसली होती, कारण धक्का लागल्यानंतर केतनने तिला पकडलं असतं.. तपासात असं देखील समोर आलं आहे की, 31 मे रोजी देखील सियाने केतनला लोहगडावरुन ढकलण्याचा प्रयत्न केलेला. पण झाडांना पकडून त्याने स्वतःचे प्राण वाचवले. त्याच वेळी सियाने साप दिसल्याचे निमित्त केलं.
आरोपींची पोलीस कोठडी
केतन अग्रवाल हत्याकांडा मधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार आहे. केतन हत्याकांडामधील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती आज संपणार आहे. आज दुपारच्या सत्रात मावळ तालुक्यातील वडगांव न्यायालयात ह्या दोघांना हजर करणार आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.