उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. येथील अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उषा मेहता मार्गावर असलेल्या एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला अचानक भीषण आग लागली.
या इमारतीमध्ये असलेल्या एका ॲनिमेशन कोचिंग सेंटरला आगीने आपल्या कचाट्यात घेतल्यामुळे तब्बल 15 निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवार दुपारी घडलेल्या या थरारक आणि भीषण अग्निकांडामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे.
14 मृतदेह डोळ्यांदेखत पाहिले - उपमुख्यमंत्री
घटना घडल्याचे समजताच राज्याचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. येथील विदारक दृश्य आणि निष्पाप मुलांची अवस्था पाहून उपमुख्यमंत्रीही भावुक झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, "मी स्वतः माझ्या डोळ्यांनी 14 मृतदेह बाहेर काढताना पाहिले आहेत." सुरुवातीला मृतांचा आकडा 14 सांगण्यात येत होता, मात्र आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी कशी घडली दुर्घटना?
अग्निशमन दलाला सोमवार दुपारी साधारण 3 वाजण्याच्या सुमारास या तीन मजली इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. या इमारतीच्या तळमजल्यावर प्राण्यांचे दुकान असून वरच्या मजल्यावर ॲनिमेशनचे कोचिंग सेंटर चालवले जात होते. अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीला धुराच्या लोटाने वेढले.
जीवाच्या आकांताने मारल्या उड्या
इमारतीला आग लागल्याचे पाहताच आतमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आगीच्या लपट आणि कोंडलेल्या धुरामुळे 7 ते 8 विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून थेट खाली उड्या मारल्या. एका तरुणाचा आगीच्या लपटामधून खाली पडतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
20 ते 25 जण अडकल्याची भीती
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर 4 ते 5 विद्यार्थी कसाबसा मार्ग काढत बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, सुरुवातीला जवळपास 20 ते 25 विद्यार्थी आत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात होती.
14 अग्निशमन गाड्या, भिंत तोडून बचावकार्य
आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने हायड्रोलिक प्लॅटफॉर्म वाहनासह एकूण 14 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या होत्या. इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणात काळा धूर साचल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करणे अत्यंत कठीण जात होते. अखेर जवानांनी जीवाची बाजी लावत ओले घोंगडे अंगावर घेऊन आत प्रवेश केला. धुरामुळे अडथळा येत असल्याने जवानांनी शेजारच्या इमारतीची भिंत तोडून आत प्रवेश मिळवला आणि शोधमोहीम राबवली. सध्या इमारतीमधील सर्व खोल्या आणि वॉशरुमची तपासणी पूर्ण झाली आहे.
मुख्यमंत्री योगी यांचा दौरा रद्द
या हृदयद्रावक घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांबद्दल संवेदना प्रकट केल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला नियोजित अलिगड दौरा तात्काळ रद्द केला आणि ते थेट लखनऊमध्ये दाखल झाले.त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, बाधित कुटुंबांशी त्वरित संपर्क साधून त्यांना सर्वतोपरी मदत करावी आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत. सध्या सर्व रुग्णालये, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके जखमींच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.