Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वेचा महाराष्ट्राला मोठा दिलासा; मेगा भरतीमध्ये 'इतक्या' जागा मराठी उमेदवारांसाठी राखीव!

रेल्वेचा महाराष्ट्राला मोठा दिलासा; मेगा भरतीमध्ये 'इतक्या' जागा मराठी उमेदवारांसाठी राखीव!


नाशिक: कोणत्याही खासगी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीपेक्षा कोणतीही शासकीय नोकरी अधिक चांगली, असा मतप्रवाह अनेकांचा असतो. अशी विचारधारणा असलेल्यांसाठी भारतीय रेल्वेने एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी रेल्वे निवड मंडळाकडून टेक्निशियन या पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  खासगी क्षेत्रात उत्तम वेतन असणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध असतात. 

परंतु, खासगी क्षेत्रात भविष्याची नोकरी कायम राहीलच, याची हमी नसते. कंपनी किंवा संस्थेचा नफा कमी झाल्यास, अचानक आर्थिक किंवा इतर आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास खासगी कंपन्या, संस्था मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करतात. त्यामुळे अचानक हातातून नोकरी जाते. अशावेळी नोकरी गेल्याने आता काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळेच कोणत्याही खासगी नोकरीपेक्षा शासकीय नोकरी बरी,असे अनेकांना वाटू लागते. मुलाने खासगी नोकरीपेक्षा शासकीय नोकरीला प्राधान्य द्यावे, असा बहुसंख्य पालकांचाही मतप्रवाह असतो. एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणावर युवावर्ग वळण्याचे ते एक कारण आहे.

शासकीय नोकरीची अपेक्षा बाळगून असणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे निवड मंडळाने एक उत्तम पर्याय दिला आहे. भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांसाठी महाभरती होणार आहे. या महाभरती अंतर्गत संपूर्ण देशात सहा हजारापेक्षा अधिक पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महाराष्ट्राटातील तरुणांनाही मोठी संधी आहे. कारण, महाराष्ट्रातील युवावर्गासाठी १४०० पेक्षा अधिक जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भरतीसाठी लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. टेक्निशियनची संपूर्ण देशात एकूण रिक्त पदांची संख्या ६, ५९४ आहे. त्यात ग्रेड १ आणि ग्रेड २ असे वर्गीकरण आहे.

टेक्निशियन ग्रेड १ अंतर्गत ३५२ आणि ग्रेड २ अंतर्गत ६, २४२ पदांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागांची संख्या १४०० पेक्षा अधिक असल्याने युवकांना चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज ३० जूनपासून भरता येऊ शकतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जुलै असल्याने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी महिन्याची मुदत आहे. टेक्निशियन पदांसाठी होणारया या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. संगणक आधारित मुख्य लेखी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. ही लेखी परीक्षा सामान्यज्ञान, गणित, बुध्दिमत्ता चाचणी आणि संबंधित तांत्रिक विषयांवर आधारीत राहील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर रेल्वेच्या नियमांप्रमाणे वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. टेक्निशियन पदांसाठी या वर्षी मिळालेली ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी धावपळ टाळण्यासाठी ३० जून रोजी अर्ज प्रक्रिया सुरु होताच रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज मुदतीत सादर करावेत. अर्ज सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत असल्याने उमेदवारांना एक उत्तम संधी आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.