सरकारला सत्तेचा माज आला आहे, त्यामुळेच प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं आहे अशी बोचरी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. CJP ने जे आंदोलन दिल्लीत सुरु केलं आहे त्यांची भूमिका योग्य आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. तसंच धर्मेंद्र प्रधान यांना अभय का दिलं जातं आहे असाही सवाल त्यांनी केला आहे.
देशाच्या सरन्यायाधीशांचं ते वाक्य ट्रॅजिक - अंजली दमानिया
देशाचे सरन्यायाधीश यांच्या एका ट्रॅजिक वाक्यामुळे चळवळीची सुरुवात झाली. तरुण मुलं बाहेर येतात आणि झुरळांप्रमाणे आंदोलन करतात वगैरे वक्तव्य केलं ते करायची काहीच गरज नव्हतं. सरन्यायाधीश पदाची एक प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा जस्टिस सूर्य कांत पाळत आहेत असं मला मुळीच वाटत नाही. मला या वागण्याच्या आणि कृतीचा खूप राग येतो असं अंजली दमानियांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली ती पाहिल्यानंतर मन सुन्न झालं. मुलींना, महिलांना मारहाण केली गेली. एका मुलीला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि त्यावर दोन पोलीस मिळून हसत होते.
प्रश्न विचारले की तुम्ही देशद्रोही ठरता - दमानिया
मी छोट्या मुलीचं एक वक्तव्य ऐकलं. ती म्हणत होती देशाचं वाटोळं झालं तरी चालेल. पूल पडले तरीही चालतील, भ्रष्टाचार झाला तरीही चालेल. तुम्ही गप्प बसलात की तुम्ही देशभक्त आणि प्रश्न विचारले की देशद्रोही. ही खरोखरच आत्ताची स्थिती आहे. तुम्ही भिंतीवर डोकं आपटून मेलात तरीही आम्हाला पर्वा नाही. तुम्हाला जे करायचं ते करा आमचा इगो इतका मोठा आहे की आम्ही आमच्या कुठल्याच मंत्र्याकडून राजीनामा घेणार नाही अशी स्थिती आहे, असं अंजली दमानियांनी म्हटलं आहे. अंजली दमानियांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.
सरकारला सत्तेचा माज आलाय-अंजली दमानिया
सरकारला सत्तेचा माज आला आहे आणि अहंकार आहे. सत्ता डोक्यात गेली आहे आणि त्यांना हे वाटतंय की आम्हाला आमच्या खुर्चीवरुन कुणी खाली खेचू शकत नाही. मला आज आणखी एक मुद्दा मांडायचा आहे तो असा कीय की शरद पवार यांनी डी लिमिटेशनसाठी सरकारच्या बाजूने मतदान केलं तर सर्वात मोठा देशद्रोह हा शरद पवार आणि त्यांचा गट करणार आहेत, त्यांनी तो करु नये. कारण डी लिमिटेशन झालं तर भाजपाला पुढच्या ५० वर्षांत कुणीही काढू शकणार नाही. डीएमके, शरद पवार यांनी शुद्धीवर यावं. सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्री करण्यासाठी हे करत असाल तर तुम्ही देशाची वाट लावता आहात असंही अंजली दमानियांनी म्हटलं आहे. शरद पवारांबाबत माझ्या मनात थोडाही आदर नाही. त्यांनी जर डी लिमिटेशनच्या बाजूने मतदान केलं तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल असंही अंजली दमानियांनी म्हटलंय.
धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशा जिंकून दिल्याने त्यांना अभय मिळतंय का? अंजली दमानियांचा सवाल
धर्मेंद्र प्रधान यांची पार्श्वभूमी संघाची आहे. ओडिशा जिंकून त्यांनी तुमच्या झोळीत घातलं म्हणून त्यांना अभय मिळतं आहे का? याची उत्तरं कोण देणार? सोनम वांगचुक यांनी हे इंजिनिअर आहेत. देशासाठी त्यांनी किती काम केलं आहे. गलवानमध्ये त्यांनी जवानांसाठी घरं बांधली. थंडीत उबदार घरं बनवली आहेत. त्यांना जगात कुठेही जाऊन खोऱ्याने पैसे कमवू शकले असते. पर्यावरणावर काम केलं. शिक्षणावर काम केलं. अशा माणसाला देशद्रोही का ठरवलं गेलं? चीनशी त्यांचे संबंध होते तर मग ते सार्वजनिक का केले नाहीत? असाही प्रश्न अंजली दमानियांनी विचारला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.