सांगली :- "शक्तीपीठ महामार्गाच्या वारंवार बदलणाऱ्या अलाइनमेंटमुळे सांगली जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक आणि बागायती शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. विकासाला आमचा अजिबात विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे पाप सरकारने करू नये! शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून कसला विकास साधताय?" असा थेट आणि अत्यंत आक्रमक सवाल आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. बाधित शेतकऱ्यांची सुरू असलेली दिशाभूल सरकारने तातडीने थांबवावी आणि या प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशी आक्रमक मागणीही त्यांनी यावेळी सभागृहात केली.
वारंवार अलाइनमेंट बदलण्यामागे गौडबंगाल काय?
डॉ. विश्वजित कदम यांनी सरकारच्या धरसोड वृत्तीवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की: सुरुवातीचा दावा: हा महामार्ग आधी दुष्काळग्रस्त आणि कोरडवाहू भागातून नेण्याची चर्चा होती, जेणेकरून त्या भागाचा विकास होईल. आताची वस्तुस्थिती: दोन ते तीन वेळा अलाइनमेंट बदलून हा महामार्ग मुद्दाम सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक सुपीक आणि बागायती जमिनींमधून नेण्याचा घाट घातला जात आहे. शेतकऱ्यांमध्ये असंतोष: सरकारच्या या मनमानी कारभारामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ असून त्यांच्यात तीव्र संतापाची लाट आहे.
"आधी न्याय द्या, मगच चाके फिरवा!"
"शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करूनच विकासाची वाटचाल झाली पाहिजे. अन्नदात्याला रस्त्यावर आणून महामार्ग बांधणार असाल, तर त्याला आमचा तीव्र विरोध राहील," असा इशारा डॉ. कदम यांनी दिला.या महामार्गाला राज्यातील अनेक जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून आधीच मोठा विरोध होत असताना, डॉ. कदम यांनी विधानसभेत हा प्रश्न लावून धरल्याने आता शक्तिपीठ महामार्गाचा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.