भूम नगरपरिषदेत काही नगरसेवकांकडून प्रशासकीय कामकाजात सातत्याने अडथळे निर्माण होत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव, धमक्या आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नगर परिषदेच्या सीईओ यांना कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मुख्याधिकारी शैला डाके यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस अधीक्षक रितू खोतर धाराशिव यांना मुख्याधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र पाठविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाकडून 28 जुलै 2026 रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रात मुख्याधिकारी नगरपरिषद, भूम यांनी केलेल्या तक्रारीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या तक्रारीनुसार नगरपरिषद सदस्य रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, आबासाहेब मस्कर, रामराजे कुंभार, नवनाथ रोकडे, विठ्ठल बागडे व पवार हे नगरपरिषद कार्यालयात वारंवार उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकतात. तसेच कार्यालयात आरडाओरडा करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे असे प्रकार घडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात या सततच्या प्रकारांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कार्यालयीन कामकाज करणे अवघड झाले आहे. तसेच स्वतःच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना संबंधित प्रकरणात आवश्यक आदेश निर्गमित करून मुख्याधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे. या पत्राच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. यापूर्वी 5 मे 2026 रोजी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात काही नगरसेवकांकडून प्रशासकीय कामात सातत्याने हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे व स्ट्रीट लाईट दुरुस्ती, शहराचा पाणीपुरवठा, नवीन नळजोडणी, कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती आदी महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे नगरअध्यक्षा संयोगिता गाढवे व आलमप्रभू शहर विकास आघाडी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते . या प्रकारामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांचा फटका बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस संरक्षणाबाबत पत्रव्यवहार केल्याने भूम नगरपरिषदेतील प्रशासकीय वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्याधिकारी भुम नगरपरिषद मध्ये हजर नसतात. त्यामुळे त्यांना धमकी देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हा नगरसेवकाविरुद्ध षडयंत्र करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप नगरसेवक आबासाहेब मस्कर यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.