सांगली :-कारागृहातील बंद्यांचे समुपदेशन व्हावे आणि समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती कमी व्हावी, या उद्देशाने आषाढी वारीचे औचित्य साधून सांगली जिल्हा कारागृहात विशेष 'कीर्तन सोहळ्या'चे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाची माहिती कारागृह अधीक्षक विजय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र राज्य कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि पश्चिम विभाग (येरवडा, पुणे) चे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांच्या मानसिक परिवर्तनासाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात.
याच उपक्रमाचा भाग म्हणून, मामासाहेब दांडेकर सेवा संघ, आळंदी (देवाची) द्वारा संचलित 'वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र' यांच्या माध्यमातून प्रसिद्ध कीर्तनकार निलेश महाराज झरेगांवकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. आपल्या कीर्तनातून त्यांनी बंद्यांना प्रबोधनपर व सन्मार्गावर चालण्याचा संदेश दिला.
या प्रसंगी सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) दत्तात्रय सरडे, सुभेदार जयवंत शिंदे, श्री. गिते गुरुजी, कारागृह कर्मचारी तसेच 'जीवन विद्या मिशन'चे पदाधिकारी अतुल हंगे व सी. बी. होमराव उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.