🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या! आई-वडिलांना ठार केल्यानंतर मुलीचाही आवळला गळा, नंतर रात्रभर....; जाण्यापूर्वी केली अंघोळ, हादरवणारी घटना

एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या! आई-वडिलांना ठार केल्यानंतर मुलीचाही आवळला गळा, नंतर रात्रभर....; जाण्यापूर्वी केली अंघोळ, हादरवणारी घटना


बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चौघांची त्यांच्याच बंद घरात हत्या करण्यात आलेल्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एका निवृत्त शिक्षकाची आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. 

शेजारी राहणारे दोन हिंदू तरुण घराच्या गच्चीवर अंमली पदार्थांचं सेवन करत होते. हे तरुण 'याबा' (मेथॅम्फेटामाइन-आधारित अमली पदार्थ) सेवन करत असताना पीडित कुटुंबीयांनी त्यांना जाब विचारला होता. शनिवारी गणपती चक्रवर्ती (65), पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50), मुलगी आगामी चक्रवर्ती प्रार्थना (23) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (12) यांचे मृतदेह त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. एका ज्वलनशील पदार्थाचा वापर करून त्यांचे चेहरे जाळण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.


संशयितांना अटक

रंगपूर महानगर पोलीस आयुक्त मोहम्मद अब्दुल माबुद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणी सिद्धार्थ दास (वय 19) आणि मुग्धा दास (वय 23) या दोन संशयितांना (जे आपापसात मावसभाऊ आहेत) अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. मुग्धा आणि सिद्धार्थ अमली पदार्थ सेवन करण्यासाठी रंगपूरमधील माचुआपारा भागात असलेल्या चक्रवर्ती कुटुंबाच्या दुमजली घराच्या छतावर चढले होते. वरून आवाज आल्याने गणपती चक्रवर्ती तिथे काय चालले आहे हे पाहण्यासाठी गेले. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, संशयितांनी चक्रवर्ती यांच्याकडील टॉवेलचा वापर करून त्यांचा गळा आवळून खून केला. गोंधळ ऐकून चक्रवर्ती यांच्या पत्नीही त्यांच्या मागोमाग छताकडे गेल्या, परंतु पायऱ्यांवरच त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली.
नेमकं काय चाललं आहे हे पाहण्यासाठी जेव्हा मुलगी खोलीबाहेर आली, तेव्हा संशयितांनी तिच्यावरही हल्ला केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी काही मिनिटं तिच्याशी झटापट केली आणि अखेरीस दोरीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांनी जोडप्याच्या 12 वर्षांच्या मुलाचीही हत्या केली. तो आपल्याला ओळखू शकेल अशी भीती वाटल्याने त्यांनी त्याला ठार केलं.

हत्या केल्यानंतर पीडितांच्या घरीच घालवली रात्र
Prothom Alo या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त माबुद यांनी सांगितलं की, हत्येनंतर ते दोन संशयित रात्रभर घरातच थांबले होते, असा पोलिसांचा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी, जेव्हा जुम्माच्या (शुक्रवारच्या) नमाजमुळे रस्ते तुलनेने मोकळे होते, तेव्हा तेथून निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी तिथे अंघोळ केली आणि कुटुंबाच्या रेफ्रिजरेटरमधील खजूर व काकडी काढून खाल्ली. त्यानंतर त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले. हे अमली पदार्थ घरातील एका टेबलावर सापडले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जाण्यापूर्वी, त्यांनी कपाटे व ड्रॉअर्स उघडले आणि कपडे व इतर वस्तू सर्वत्र विखुरल्या. त्यांनी पीडितांच्या घरातून सोन्याचे दागिनेही लुटले आणि कुटुंबाचे दोन मोबाईल फोन डिटर्जंट असलेल्या पाण्यात बुडवून नष्ट केले.

'प्रथम आलो'च्या वृत्तानुसार, त्या दोघांनी आगीच्या साहाय्याने सोन्याच्या बांगडीची शुद्धता तपासण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावेही पोलिसांना सापडले आहेत. सिद्धार्थ माशांचा व्यवसाय करतो, तर मुग्धा सोनार म्हणून काम करत असे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिद्धार्थ आणि मुग्धा यांना अटक केली असून, त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. पीडितांच्या घरातून लुटलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असतानाच, घरातून जप्त करण्यात आलेल्या खजुराच्या बियांचा वापर करून त्यांच्या डीएनएची (DNA) चाचणी केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.