दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानं छाप पाडणारे अभिनेते प्रकाश राज हे राजकीय घडामोडींवर सडेतोड भूमिका मांडत असतात. भाजप, मोदी सरकार हे त्यांच्या कायमच निशाण्यावर राहिले आहेत. आताही प्रकाश राज यांनी देशात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेनंतर त्यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी मंगळवारी(ता.11) अलिकडेच सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम आणि X या प्लॅट फॉर्मवर कॅप्शनसह व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे मोठा दावा करत एसआयआर प्रक्रियेवरुन चिमटा काढला आहे. यात त्यांनी मतदारयादीतून त्यांचं नाव वगळण्यात आल्याचा दावा केला आहे.
प्रकाश राज यांनी म्हणाले, बंगळुरू मतदारसंघातील त्यांचा मतदानाचा अधिकार हटवण्यात आला असून, एसआयआर प्रक्रियेनंतर असे घडल्याचंही त्यांनी सांगितलं. अभिनेत्यानं पोस्टसोबत कॅप्शनमध्ये "मित्रांनो..., तुम्ही काही नागरिकांचे मतदानाचे अधिकार काढून घेऊ शकता किंवा त्यांना नाकारू शकता, जे कदाचित तुम्हाला पुन्हा सत्तेत आणणार नाहीत. पण तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्चीवर आहात, तिथून तुम्हाला खाली खेचण्याच्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही रोखू शकाल का?', असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रकाश राज यांनी दावा केला आहे की, एसआयआर प्रक्रियेनंतर ज्या 65 लाख मतदारांचे मतदानाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत, त्यापैकी ते एक आहेत. अभिनेत्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले, "मित्रांनो, सहकाऱ्यांनो, मला तुमच्यासोबत एक विनोद शेअर करायचा आहे. मी त्या 65 लाख मतदारांपैकी एक आहे, ज्यांचे नाव बंगळुरू मतदारसंघाच्या मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. वा! किती छान विनोद झाला आहे, नाही का?"
प्रकाश राज यांनी पुढे म्हटले, "तुमच्या माहितीसाठी सांगतो की, माझा जन्म याच मतदारसंघात झाला. मी याच ठिकाणी राहिलो, याच ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि थिएटरही केले. "तुमच्या माहितीसाठी आणखी एक गोष्ट सांगतो, मी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचा उमेदवारही राहिलो आहे. "असो, विनोद चांगला आहे. आता खेळ सुरू झाला आहे," असेही प्रकाश राज यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.